सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी ८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले.
या कारखान्यांमध्ये राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
२०२४-२५ च्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील आठ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना देय असलेली ५७कोटी ३२ लाख रुपयांची एफआरपी रक्कम वेळेवर अदा केली नाही. साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावून सुनावणी घेतली.
सुनावणीनंतर ही थकीत रक्कम जमा न झाल्याने, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस व बगॅस यांसारख्या मालमत्तेची विक्री करून थकीत रक्कम वसूल करण्यात येणार आहेत.
साखर आयुक्तांनी कारखान्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. थकीत रकमेवर १५ टक्के व्याजासह वसुली करण्याचेही निर्देश दिले आहेत.
राज्यात 'हे' साखर कारखाने...
अहिल्यानगर जिल्हा : केदारेश्वर सहकारी साखर कारखाना (अहिल्यानगर) २५ कोटी ७६ लाख ५ हजार रुपये.
पुणे जिल्हा : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना (इंदापूर) ८ कोटी ५८ लाख ५४ हजार रुपये.
सोलापूर जिल्हा : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (लवंगी) १ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये. भैरवनाथ शुगर वर्क्स लि. (आलेगाव २ कोटी २५ लाख ९ हजार रुपये. भीमा सहकारी साखर कारखाना, (टाकळी सिकंदर) १ कोटी २६ लाख २७ हजार रुपये.
जालना जिल्हा : समृद्धी शुगर्स लि. (रेणुकानगर, ता. घनसावंगी) १३ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपये.
यवतमाळ जिल्हा : डेक्कन शुगर्स प्रा.लि. (मंगलोर) १ कोटी ११ लाख ९ हजार रुपये.
बुलढाणा जिल्हा : पेनगंगा शुगर फॅक्टरी प्रा.लि. (वरुडधाड) २ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये.