फेब्रुवारी महिन्यास सुरूवात झाली असून खारपाण पट्टयातील परिस्थिती यावर्षीही बदललेली नाही, त्यामुळे चाऱ्याचे भाव (Rate) गगनाला भिडले आहेत. ही बाब सध्या शेतकरी आणि पशुपालकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
चारा विकत घेण्यासाठी पशुपालकांना अनेक ठिकाणी धडपड करावी लागत आहे. मागील काही वर्षापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढला आहे, तसेच सुरुवातीला पाऊस न पडल्याने पेरणी उशिरा झाली.
पिकांवरील (Crop) रोगराईचे प्रमाण वाढले आहे आणि शेतमालाला (Agricultural goods) अपेक्षित भाव मिळणे दुरापास्त झाले आहे. मूग (Moong), उडीद (Udid), ज्वारी (Sorghum), सोयाबीन (Soybean) आणि तूर (Tur) या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या पिकांची पेरणी जवळपास थांबली आहे.
मागील दोन-तीन वर्षांपासून कपाशी पिकांची (Cotton Crop) आवक वाढल्यामुळे चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने चारा अधिकच महागणार आहे.
चाऱ्यासाठी फिरावे लागते वणवण
मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन आणि तूर या पिकांचा पेरा कमी झाल्यामुळे गावात चारा मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत पशुपालकांना ५०-६० किलोमीटर अंतरावर जाऊन चारा विकत आणावा लागत आहे.
उन्हाळ्यात जनावरे विकावी का?
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पशुपालकांची स्थिती गंभीर झाली आहे. जनावरांना काय खाऊ घालावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. पुढे उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. त्यावेळी चाऱ्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकरी आणि पशुपालकांनी जनावरे विकावी का, असा प्रश्न पशुपालकांना पडलाय.
गावात चारा मिळत नाही. त्यामुळे बाहेरगावातून चारा आणावा लागतो. चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरचे भाडेही लागते. त्यामुळे चाऱ्याचे भाव आणखी जास्त पडतात. - गोपाल बोळे, पशुपालक
वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे आणि पिकांचा पेरा कमी झाल्यामुळे गावात चारा मिळत नाही. त्यासाठी आम्हाला बाहेरगावाहून चारा विकत आणावा लागतो. - रामजी मांगूळकार, पशुपालक