Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agro Advisory: वाढत्या उन्हात फळबागेची अशी घ्या काळजी; वाचा कृषी सल्ला सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:05 IST

Agro Advisory : वाढत्या उन्हात फळबागेची कशी काळजी घ्यायची याची माहिती आणि कृषी सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे. वाचा सविस्तर

वाढत्या उन्हात फळबागेची कशी काळजी घ्यायची याची माहिती आणि कृषी सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे. वाचा सविस्तर 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर दक्षिण भागात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील २४ तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर दक्षिण भागात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात  २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद : हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

हरभरा : उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.

करडई : करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

तीळ : वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड २०% एसपी २ ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

 तुती रेशीम उद्योग

रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला आदी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत. पुर्वी शेतातील जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट आदीचे प्रमाण किंवा शिल्लक राहीलेला अंश जमिनीत राहिलेला असतो. 

नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर किटक मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात. त्यावर उपाय म्हणजे २० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा ५ टन गांडूळ खत समान २ हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांचा घरी खुराक तयार करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून ३३% पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी घ्यावी.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीफळेपीक व्यवस्थापन