Join us
Daily Top 2Weekly Top 5

४५ अंश तापमानाचा फटका, भूजल पातळी खालावली; रावेर तालुक्यात केळीबागांवर संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:17 IST

४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाचा फटका कापणीवरील तसेच निसवणीवरील केळीबागांना बसत असून केळी खोडांचे कंबरडे मोडणे, परिपक्व व अपरिपक्व घड निसटून पडणे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर हानी सुरू झाली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्याच्या पूर्व भागातील केळी पट्टयात भीषण उष्णतेमुळे आणि झपाट्याने खालावलेल्या भूजल पातळीमुळे केळीबागांचे पाणी व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे.

४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाचा फटका कापणीवरील तसेच निसवणीवरील केळीबागांना बसत असून केळी खोडांचे कंबरडे मोडणे, परिपक्व व अपरिपक्व घड निसटून पडणे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर हानी सुरू झाली आहे.

गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पातही ३० टक्के साठा शिल्लक असल्याने केळी उत्पादक चिंतेत आहेत. अजनाड, अटवाडे, चोरवड, खानापूर, निरूळ, पाडळे आणि अहिरवाडी परिसराला सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नागोई नदीचे वरदान होते. पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्याने विहिरी व कूपनलिकांची भूजलपातळी टिकून राहत होती.

मात्र, गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प उभारल्यानंतर नदी-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह मंदावला. परिणामी भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण कमी झाले. अनियमित पावसामुळे धरण भरत असले तरी प्रत्यक्ष सिंचनाला त्याचा अपेक्षित लाभ होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

विहिरींचा उपसा थेट दोन तासांवर

पूर्वी सलग आठ तास सुरू राहणाऱ्या विहिरी आता केवळ दीड ते तीन तासच पाणी देत आहेत. त्यामुळे दिवसाला दहा ते पंधरा हजार केळी खोडांचे होणारे पाणी व्यवस्थापन आता अशक्य बनत चालले आहे.

अपुऱ्या पाण्यामुळे केळीबागा तगवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस धावपळ करावी लागत आहे. अजून मे-जून महिन्यात उष्णतेचा तडाखा वाढण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

गंगापुरी प्रकल्पातून एक आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, सध्या केवळ ३० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दुसरे आवर्तन सोडणे शक्य नाही. - शुभम पाटील, शाखा अभियंता, गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प.

पूर्वी दिवसभर सुरू राहणाऱ्या विहिरी आता अडीच-तीन तासांवर आल्या आहेत. उभ्या केळीबागांचे पाणी व्यवस्थापन करणे तारेवरची कसरत बनली आहे. उष्णतेचा तडाखा आणखी वाढल्यास मोठे संकट ओढवू शकते. - जितेंद्र पाटील, शेतकरी, निरूळ.

दुसऱ्या आवर्तनाची शक्यता मावळली

गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पातून शुल्क आकारून एक आवर्तन सोडण्यात आले असले तरी आता धरणात फक्त ३० टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे दुसरे आवर्तन सोडण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे पुढील दीड महिना केळीबागांचे पाणी व्यवस्थापन कसे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. काही भागातील बागा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतकरीशेतीउष्माघातउष्णतेची लाटजळगाव