गजानन खिराडे
पाऊस पडल्यानंतर खरिपात हळद लागवड करू असे म्हणून हळदीचे बेणे विकत घेतले. परंतु लागवडीच्या आधल्या रात्रीलाच चोरट्यांनी हळदीचे २४ कट्टेच लंपास केले. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खरीप हंगामात हळदीची लागवड करावी म्हणून हिंगोली जिल्ह्याच्या वरुड चक्रपान (ता. सेनगाव) येथील शेतकरी माणिक सीताराम कोटकर यांनी हळदीचे बेणे विकत घेतले. यानंतर हे बेणे शेतकऱ्याने शेतात नेऊन ठेवले. परंतु चोरट्यांनी पाळत ठेवून हळदीचे २४ कट्टे चोरून नेले.
त्यामुळे आता शेतकऱ्यावर ऐन खरीप हंगामातच आर्थिक संकट कोसळले आहे. पोलिस प्रशासनाने खरिपाच्या हंगामात तरी शेत शिवारात गस्त वाढवून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे संरक्षण करावे, अशी मागणी इतर शेतकऱ्यांतून होत आहे. वरुड चक्रपानचे शेतकरी कोटकर यांचे खरीप हंगामात ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे वरुड चक्रपान परिसरातील शेत शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात हळदीचे बेणे चोरीला गेल्याची तक्रार शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा : परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार