Join us

जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:53 IST

acidosis in livestock खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो.

अनेक वेळा आपण घरी सण, समारंभ असेल तर उरलेले अन्नपदार्थ किंवा घरचे शिळे अन्न मोठ्या प्रमाणात घरच्या जनावरांना खाऊ घालतो. त्यामुळे जनावरे आजारी पडतात. दूध उत्पादन घटते.

अनेक वेळा जनावरे सुटून वाळत घातलेले किंवा उघड्यावर ठेवलेले धान्य भराभर खाऊन घेतात. त्यावेळी देखील आपली जनावरे आजारी पडतात. अनेक वेळा वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू देखील पावतात.

अचानक अशाप्रकारे खाद्यातील झालेला बदल जनावरातील चयापचय क्रिया बिघडवतो. जादा प्रमाणात कोठी पोटात आम्ल निर्माण होते. त्यावेळी हा आम्ल विषार (ॲसिडोसिस) नावाचा आजार होतो.

आम्ल विषार (ॲसिडोसिस) आजाराची लक्षणे◼️ या आजारात मुळातच जो कोठी पोटाचा सामू ६.५ ते ७ पर्यंत असतो तो एकदम ४ ते ५ पर्यंत खाली येतो.◼️ आम्लधर्मीय होऊन पोटाची हालचाल मंदावते, पोट गच्च होते.◼️ भूक व अन्नपचनावर परिणाम होतो.◼️ किण्वन प्रक्रियेत बादा येऊन पोटात खाल्लेले अन्न कुजते, अपचन होते.◼️ कोठी पोटातील पचनासाठी मदत करणारे जिवाणू अशावेळी ज्यादा प्रमाणात आम्ल निर्माण करतात. त्याचे प्रमाण वाढते.◼️ त्यामुळे पुन्हा चांगल्या जिवाणूंची संख्या कमी होऊन इतर हानिकारक जिवाणू वाढतात.◼️ वाढलेल्या अम्लामुळे शरीरातील रक्तात अल्कलीचे प्रमाण कमी होते.◼️ अशावेळी जर योग्य निदान वेळेत झाले नाही तर जनावराचा मृत्यू हा ओढावतोच.◼️ साधारणपणे दूध कमी देणे, रवंत कमी करणे, दुधाला फॅट कमी लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे या आजारात दिसतात.◼️ अनेक वेळा जनावरे पातळ किंवा ज्यादा कडक शेण टाकतात.◼️ त्यामध्ये बुडबुडे, शेंब यासह न पचलेली वैरण व धान्य जसेच्या तसे बाहेर पडलेले आढळते.◼️ खुरांचा दाह होऊन जनावरे लंगडताना दिसतात.◼️ अनेक वेळा पोट फुगते.◼️ काहीवेळा चारवट देखील तोंडावाटे बाहेर पडते.

आम्ल विषार (ॲसिडोसिस) साठी उपाय◼️ खायचा सोडा, मॅग्नेशियम ऑक्साईड, ऍक्टिव्हेटेड चारकोल, १२% फॉर्मालीन यांचा वापर करून आम्लवाढी चे प्रमाण आपल्याला कमी करता येते.◼️ यामध्ये सौम्य, तीव्र, अति तीव्र असे प्रकार असल्यामुळे तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार करून घ्यावेत.◼️ सोबत खाद्यात अचानक बदल होणार नाहीत याची काळजी घ्यावी.◼️ घरी उरलेले शिळे आणणे टाकून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना खाऊ घालू नये.◼️ नवीन पशुखाद्य, वैरण नेहमी हळूहळू त्याचे प्रमाण वाढवत जावे.अशा प्रकारे हा चयापचयाशी संबंधित आम्ल विषार आजारा पासून आपले पशुधन जपावे.

अनेक वेळा गोठ्यातील जनावरे मोठ्या प्रमाणात एकाच वेळी या आजाराने बाधित होऊ शकतात. अशावेळी सर्वच जनावरावर एकाच वेळी उपचार करणे अवघड होऊ शकते. किमती व महत्त्वाच्या जनावरावर लक्षणाच्या तीव्रतेनुसार उपचार करावेत.

उपचारासाठी व मिळणारा प्रतिसादासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे अशावेळी दोन ते तीन पशुवैद्यकांना एकाच वेळी बोलवून घेतल्यास आपण आपले होणारे नुकसान टाळू शकतो.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: अचानक पडणाऱ्या विजांपासून कसे कराल जनावरांचे संरक्षण; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीअन्नपीकगाय