Janavarancha Ahar : जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि एकूणच उत्पादकता जनावरांना मिळणाऱ्या आहारावर (Livestock Feed) अवलंबून असते. संतुलित आहारामध्ये चारा, खुराक आणि पाण्याची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. आता पावसाचे दिवस असून या काळात हिरवा चारा मिळतो, मात्र या काळात आणखी काय संतुलित आहार असायला हवा, हे पाहुयात...
संतुलित आहार
- पावसाळ्यात कोवळे गवत जनावरांना जास्त खाण्यास देऊ नये.
- कोवळ्या गवतात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आणि कमी तंतुमय घटक असतात.
- पचन सुकर होण्यासाठी तंतुमय पदार्थाची आवश्यकता असते.
- कोठीपोट पाण्याने भरले असेल तर पचनाला त्रास होतो.
- साठवणूक केलेला चारा, खाद्यावर या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे खाद्य जनावरांना खाऊ घातल्यास यकृतावर विपरीत परिणाम होऊन पचन व प्रजननावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- पावसाळ्यात खाद्य, चारा कोरड्या जागेत ठेवावा. बुरशी लागली आहे का याची वरचेवर तपासणी करावी.
- या काळात टॉक्सीन बाईंइंडरचा खाद्यात वापर करावा जेणेकरून बुरशी मुळे होणारे परिणाम कमी करता येऊ शकतील.
- पावसाळी वातावरणात गाई, म्हशी आणि इतर जनावरांना त्यांच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी ऊर्जेची गरज असते, शरीरावरील केस ओले असतील, तर ऊर्जेची गरज अजून वाढते.
- पशुखाद्यात ऊर्जायुक्त घटक जसे मका १ किलो किंवा बायपास फॅट १०० ग्रॅम अतिरिक्त द्यावेत.
- जनावरांची रोग प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, खुरे मजबूत ठेवण्यासाठी झिंक आणि बायोटीनयुक्त पशुखाद्यपूरक दररोज खाद्यातून द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी