फकीर मोहम्मद बागवान
देशी गायींचे संगोपन आणि जैविक खतांचा उपयोग करून जंगले भावंडांनी १२५ एकर विषमुक्त शेतीचे स्वप्न साकारले. ही कथा केवळ शेतीची नाही, तर आत्मनिर्भरतेची आहे.(Dairy Farming)
अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील बबन जंगले, बाळासाहेब जंगले, दिनकर जंगले या तीन शेतकरी भावंडांनी १२५ एकर वडिलोपार्जित शेती विषमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.(Dairy Farming)
त्यांच्या वडिलांना ७५ वर्षापूर्वी एक गाय आंदण मिळाली होती. तेव्हापासून जंगले परिवार देशी जनावरांची जपणूक करत असून, आज त्यांच्याकडे ३३ देशी जनावरे आहेत.(Dairy Farming)
देशी गायींपासून शेणखत ते देशी तूप
अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात बबन, बालासाहेब आणि दिनकर जंगले या भावंडांनी पारंपरिक देशी शेतीला आधुनिक दृष्टिकोन दिला आहे. त्यांनी रासायनिक शेतीला फाटा देत पूर्णपणे जैविक पद्धतीचा स्वीकार करत विषमुक्त शेतीचा एक आदर्श मॉडेल तयार केला आहे.
३३ देशी गायींचा गोठा
जंगले कुटुंबाची देशी गायींबद्दलची नाळ ७५ वर्षांपूर्वीपासूनची आहे. त्यांच्या वडिलांना आंदणातून मिळालेली एक गाय आज ३३ गायींपर्यंत वाढली आहे. कधी १०० ते १२५ गायींपर्यंत पोहोचलेल्या जनावरांची संख्या मजुरांच्या टंचाईमुळे कमी झाली असली, तरी तितक्याच श्रद्धेने त्यांचे पालनपोषण सुरू आहे.
शेतीत जैविक खताचा वापर
आजही जंगले बंधू १२५ एकर शेतीमध्ये ९० टक्के क्षेत्रावर देशी शेणखत, जीवामृत, दशपर्णी अर्क व गोमूत्र यांचा वापर करतात. हे खत घरच्या ३३ गायींपासून मिळणाऱ्या ४५ ट्रॉली शेणखतांमधून तयार होते.
त्यांची दहा एकरांची मोसंबीची बाग केवळ शेणखतावर जोमात फुलते. त्यामुळे बाजारात या मोसंबीला विशेष मागणी आहे.
शेतीमधून उच्च उत्पादन
२०२३ मध्ये जंगले बंधूंनी रासायनिक खत व औषधांचा उपयोग न करता १०० क्विंटल तूर आणि १०० क्विंटल शाळू ज्वारीचे उत्पादन घेतले. यातून त्यांच्या विषमुक्त शेतीच्या धोरणाची ताकद स्पष्ट होते.
देशी तुपाची निर्मिती; बाजारात ८०० रु/किलो
लाल कंधारी गायींपासून त्यांना रोज १२ लिटर दूध मिळते, ज्यापासून महिन्याला ७ किलो शुद्ध देशी तूप तयार होते. या तुपाला बाजारात ८०० रुपये प्रति किलोचा दर मिळतो. त्यामुळे हे दुग्धव्यवसायाचेही एक चांगले उत्पन्नाचे साधन ठरले आहे.
गायींसाठी स्वतंत्र पिकांची पेरणी
या देशी जनावरांच्या खाद्य व्यवस्थेसाठी जंगले बंधू दरवर्षी १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करतात. त्यामुळे वर्षभर पुरेसा कडबा आणि चारा जनावरांसाठी मिळतो.
जंगले बंधूं काय सांगतात
शेती ही फक्त नफा मिळवण्यासाठी न करता, ती पर्यावरण, आरोग्य व टिकावासाठी असावी. देशी गायींमुळे केवळ शेती नाही, तर आपले आरोग्यही चांगले राहते. - बबन जंगले, शेतकरी
काय आहे विशेष
* विषमुक्त शेतीचे उदाहरण
* देशी गायींचे संवर्धन
* संपूर्ण जैविक खताचा वापर
* पर्यावरणपूरक शेतीचे मॉडेल
* स्वयंपूर्णता आणि नफा यांचा उत्तम मेळ