Join us

पावसाळ्यात शेताच्या बांधावर वाढलेलं ताजं गवत शेळ्यांसाठी फायद्याचे की धोक्याचे? वाचा सविस्तर

By रविंद्र जाधव | Updated: June 26, 2025 15:39 IST

Goat Fodder Management In Rain : पावसाळ्यात ताजे गवत शेळ्यांना देणे फायदेशीर ठरेल. परंतु विशेष काळजी घेतली नाही तर हेच गवत शेळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ते कसे व गवतापासून शेळयांना नक्की धोका कसा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती. 

पावसाळा हा शेतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ऋतु आहे. या काळात जमिनीत नैसर्गिकरीत्या नवीन गवत उगते.

दरम्यान बहुदा शेतकरी बांधवांना वाटते की हे ताजे गवत शेळ्यांना देणे फायदेशीर ठरेल. परंतु विशेष काळजी घेतली नाही तर हेच गवत शेळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ते कसे व गवतापासून शेळयांना नक्की धोका कसा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती. 

अपचन व पोट फुगणे (Bloat)

पावसाळ्यात गवत हे ओलं आणि रसयुक्त असत मात्र पूर्णपणे वाढ झालेले की परिपूर्ण राहत नाही . जर हे गवत थेट व भरपूर प्रमाणात शेळ्यांना दिलं गेलं तर त्यातून त्यांच्या पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि शेळीला अपचन, पोट फुगणे, श्वास घेण्यात अडचण अशा त्रासदायक लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. काही वेळा ही अवस्था जीवघेणी ठरू शकते.

कृमिरोगाचा धोका

पावसाळ्यात माती ओलसर असल्यामुळे जमिनीत विविध परजीवी (worms) सक्रिय होतात. हे परजीवी गवतासोबत शेळ्यांच्या पोटात जातात. यामुळे कृमिरोग होण्याची शक्यता वाढते. लक्षणांमध्ये वजन कमी होणे, डोळे फिकट होणे, अशक्तपणा इत्यादींचा समावेश होतो. यासाठी योग्य वेळी कृमिनाशक औषध न दिल्यास शेळ्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.

फंगल विषारीपण (Mycotoxins)

ओल्या हवामानात गवतावर बुरशी (फंगस) वाढते. ही बुरशी काही वेळा विषारी घटक तयार करते ज्याला मायकोटॉक्सिन्स म्हणतात. हे पदार्थ शेळ्यांच्या यकृतावर (लिव्हर) वाईट परिणाम करतात. त्यामुळे अन्न पचवण्याची क्रिया मंदावते तसेच शरीरात विष जमा होते आणि शेळ्या आजारी पडतात. काही वेळा गर्भवती शेळ्यांमध्ये गर्भपातही होऊ शकतो.

जुलाब आणि अशक्तपणा

ताज्या गवतामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर हे गवत प्रमाणाच्या बाहेर दिले गेले तर शेळ्यांना जुलाब होऊ शकतात. सततचा जुलाब म्हणजे शरीरातील पाण्याचा आणि क्षारांचा तोटा. यामुळे शेळ्या अशक्त होतात आणि त्यांची वाढ खुंटते.

काळजी घेण्याचे उपाय

• ताजे गवत थोडावेळ उन्हात वाळवून मगच शेळ्यांना किंबहुना इतर पशुधनास खाण्यास द्यावे.

• गवत साठवून ठेवल्यास त्यावर अनेकदा बुरशी लागू शकते अशावेळी स्वच्छ, बुरशीविरहित व वासहीन गवतच जनावरांना द्यावे. 

• पावसाळ्यात कृमिनाशक गोळ्या (Deworming Tabblet) दर ३-४ महिन्यांनी द्याव्यात.

• वैरणीत गवताचे प्रमाण हळूहळू वाढवावे एकदम भरपूर गवत देऊ नये.

• चाऱ्यात कोरड्या चाऱ्याचा (सुकवलेले गवत, कडधान्यांचे कांड, भुस्सा) यांचा समावेश करावा.

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

टॅग्स :शेळीपालनदुग्धव्यवसायपाऊसदूधशेती क्षेत्रशेतकरीशेती