Join us

जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:19 IST

युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते.

युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते.

त्यामध्ये युरियाचा वापर केला जातो. त्याचे प्रात्यक्षिक वेगवेगळ्या योजनांमधून सादर केले जाते. पण कोणीही पशुपालक स्वतः तसा प्रयोग करायला धजावत नाहीत हा अनुभव आहे. इतकी दहशत या युरिया विषबाधेची पशुपालकामध्ये आहे हे वास्तव आहे.

युरियाची विषबाधा ही सर्वच जनावरांमध्ये आढळते. खरंतर युरियाचा वापर हा फार पूर्वीपासून पशुखाद्यात, चाटण विटा, (युरिया मोलेसिस ब्लॉक) युरिया प्रक्रिया केलेला निकृष्ट चारा यामध्ये केला जात आहे.

ज्या ठिकाणी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने काटेकोर मात्रेत आणि योग्य युरियाचा वापर केला जातो अशा ठिकाणी युरियाची विषबाधा होत नाही. पण जर का त्याचे प्रमाण जास्त झाले तर विषबाधा निश्चित होतेच.

पशुखाद्यामध्ये युरिया का वापरला जातो?पशुखाद्य, चारा प्रक्रिया यामध्ये युरिया वापरल्यामुळे रवंथ करणाऱ्या जनावरांच्या कोठी पोटात अमोनिया तयार होतो. पोटातील जिवाणू चयापचय क्रियेत त्या अमोनियाचे अमायनो ॲसिड या प्रथिनेत रूपांतर करतात व जनावरांची उत्पादकता वाढवतात. हे युरिया वापरण्यामागचे शास्त्र आहे.

युरियाची विषबाधा कधी होते व त्याची लक्षणे◼️ ज्यावेळी प्रमाणापेक्षा जादा युरिया वापरला जातो, युरिया खताची रिकामी पोती व पाट्या जनावरे चाटतात.◼️ पोती उघडी ठेवली तर जनावराकडून चुकून खाल्ले जाते अशावेळी युरियाची विषबाधा होते.◼️ वेळेत योग्य उपचार मिळाले नाही तर मृत्यू ओढवतो.◼️ यामध्ये जनावरांच्या तोंडाला फेस येतो.◼️ जनावरे दात खातात, लाळ गळते.◼️ पोटात तीव्र वेदना होतात.◼️ जनावरांना उभे राहता येत नाही, पोट फुगते.◼️ जनावर उठ बस करते.◼️ थोडी थोडी लघवी करत राहते.◼️ श्वासोच्छ्वास वाढतो.◼️ रक्तातील कॅल्शियम कमी होऊन जनावरे उत्तेजित होतात आणि शेवटी दगावतात.

कसे कराल उपचार?◼️ अत्यंत तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा जनावरे दोन ते चार तासातच मृत्युमुखी पडतात. उपचाराला अनेक वेळा वेळ देखील मिळत नाही.◼️ उपचार म्हणून व्हिनेगार (ॲसिटिक ॲसिड) हळूहळू पाजणे आवश्यक आहे.◼️ हे आम्ल (ॲसिड) असल्यामुळे काळजीपूर्वक पाजणे महत्त्वाचे आहे.◼️ साधारण मोठ्या गाईला चार लिटर व्हिनेगार पाजावे.◼️ वेळ पडल्यास प्रत्येक अर्ध्या तासाला लक्षणे बंद होईपर्यंत पाजत राहणे आवश्यक आहे.◼️ कोठी पोटात थंड पाण्यासह थेट देखील सोडून जनावरे बरी करता येतात.◼️ त्यामुळे अमोनिया निर्मिती खंडित होते व युरिया पूर्णपणे निष्क्रिय केला जातो.◼️ या सर्व औषधोपचारासह पूरक औषधोपचार तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्यावेत.◼️ जनावर बरे झाल्यानंतर कोठी पोटातील जिवाणू संवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केल्यास जनावर पूर्णपणे उत्पादनावर येऊ शकते.

पशुपालकांनी काय काळजी घ्यावी?◼️ युरिया त्याची पोती वापरताना पशुपालकांनी काळजी घ्यावी.◼️ जनावरे पाण्यावाचून खूप दिवस उपाशी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.◼️ साधारणपणे ०.१ ग्रॅम युरिया जनावराच्या प्रतिकिलो वापरावा.◼️ साधारण ४०० किलो वजनाच्या गाईसाठी रोज ३५ ते ४० ग्रॅम पेक्षा जास्त युरिया वापरता कामा नये.◼️ युरिया तसा पशुखाद्य, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे.◼️ त्यामुळे आपण कमी खर्चात प्रथिनाचे प्रमाण वाढवू शकतो. पण वापर मात्र योग्य प्रमाणात केला पाहिजे हे निश्चित.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय?

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतीशेतकरीखतेदूधगाय