आकाश येवलेराहुरी : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूधव्यवसाय करतात. परंतु, या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे उतरती कळा लागली आहे.
उत्पादकाच्या दुधाला ३१, तर पॅकेजिंगच्या दुधाला ५८ रुपयांचा दर मिळत आहे. पशुखाद्यही महागले आहे. या सर्व गोष्टींमुळे दूध व्यवसायाची मर मर झाली असून, व्यापाऱ्यांची मात्र चंगळ झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्याने दुधापासून निर्माण होणाऱ्या उपपदार्थाची मागणी घटली आहे. त्यामुळे दुधाच्या दरामध्ये कमालीची घट झाली असल्याचे व्यापारी सांगतात.
दुसऱ्या बाजूला खाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी दूध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत चालला आहे. पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारने दूध अनुदानाची घोषणा केली, परंतु ते अद्याप सर्व उत्पादकांच्या खात्यात जमा झालेले नाही.
खर्चाचा विचार केला तर दुधाला प्रति लिटर २७ ते २८ रुपये दूध निर्माण करण्यासाठी खर्च येतो. खर्चाच्या तुलनेत ४० ते ४५ रुपयांचा दर अपेक्षित आहे.
असे आहेत खाद्याचे दरवालीस १३००कांडी १६५०पेंड २०००
सरकीचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे सरकी पेंड महागली आहे. अजूनही भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. - अविनाश मुसमाडे, पशुखाद्य व्यापारी
दुग्ध व्यवसाय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशोधडीला लागला आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. अनुदानही रखडले. आम्हाला अनुदानाची भीक नको. दुधाला प्रति लिटर ४० ते ४५ रुपयांचा हमीभाव द्या. पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणा. - चिमा कारंडे व भानुदास तोडमल, दूध व्यावसायिक
यावर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली. परिणामी दुधापासून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांची मागणी घटली. ३० रुपये प्रति किलो दूध पावडरीचे दर कमी झाले. परिणामी दुधाचे दर पडले आहेत. ते आणखी पडणार असून, ते ३० रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. - सचिन उंडे, चेअरमन, श्रीकृष्ण मिल्क
दुधाला ४० रुपये हमीभाव दिला पाहिजे. प्रति लिटर १० रुपये व दूध भुकटी निर्यातीला १०० रुपये अनुदान दिले पाहिजे. अन्यथा गुराढोरांसह नगर मनमाड रोडवर चक्का जाम करू. - रवींद्र मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अधिक वाचा: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी 'या' पोर्टलवरून अर्ज घेण्यास सुरवात; कसा कराल अर्ज?