नंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही दोन ते अडीच लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून, जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांचा साखर हंगाम हा मार्चअखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आठ लाख २५ हजारांपेक्षा अधिक ऊस गाळप झालेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेशातील खांडसरींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ऊस नेला जात असल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. त्यापैकी शहादा येथील ओंकार शुगर व नंदुरबार तालुक्यातील आयान मल्टिट्रेड शुगर हे दोन साखर कारखाने सुरू आहेत. आयान साखर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता मोठी असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊन साखर उत्पादन होत असते.
आयान साखर कारखान्याकडून सर्वाधिक ऊस गाळप
यंदा आतापर्यंत आयान साखर कारखान्याने एकूण सहा लाख ९४ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. या कारखान्याची गाळप क्षमता १० हजार मेट्रिक टन दैनंदिन आहे. सुरुवातीपासूनच अर्थात गाळप हंगाम सुरू झाल्यापासून कारखाना नियमित सुरू असल्याने या कारखान्याने गाळप करण्याचा विक्रम केला आहे.
लागून याशिवाय जिल्ह्याला असलेल्या तळोदा, कुकरमुंडा हे गुजरातमधील तर मध्य प्रदेशातील मेंदराना येथील खांडसरी सुरू आहेत. या पाचही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊस नेला जात आहे. दोन्ही कारखाने आणि खांडसरी आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, साखर उत्पादन देखील अपेक्षित करीत असल्याचे चित्र आहे.
ओंकारकडून सव्वा लाख...
शहादा येथील ओंकार शुगर कारखान्याचा तांत्रिक अडचणी आल्याने या कारखान्याचा गाळप हंगाम काहीसा लांबला होता. तरीही या कारखान्याने एक लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. सरासरी एक लाख २९ हजार मेट्रिक टन ऊस गाळप या कारखान्याने केला आहे. दोन लाख मेट्रिक टनापर्यंत गाळपची शक्यता आहे.
आणखी दीड महिना...
साखर हंगाम आणखी दीड महिना राहण्याची शक्यता आहे. जवळपास दोन ते अडीच लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. हा सर्व ऊस जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाला तरी दोन्ही कारखाने मार्चअखेरपर्यंत सुरू राहतील, अशी शक्यता आहे. होळीपर्यंत मजूर टिकून राहतात, नंतर मात्र त्यांना परतीचे वेध लागत असतात.
