निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 05:18 PM2024-05-05T17:18:34+5:302024-05-05T17:19:51+5:30

Sunil Tatkare vs Jayant Patil Raigad, Lok Sabha Election 2024: याआधीही आरोप झाले पण जनतेने मला स्वीकारले, यावेळीही ४ जूनला विजयाची पुनरावृत्ती होणार, असा व्यक्त केला विश्वास

Lok Sabha Election 2024 Maharashtra Raigad Sunil Tatkare says he is innocent and no connection to Irrigation scam | निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे

निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे

Sunil Tatkare vs Jayant Patil Raigad, Lok Sabha Election 2024: 'कृषीवल' दैनिकात जे काही छापून आले आहे 'त्या' प्रकरणाशी माझा अजिबात संबंध नाही. केंद्रीय यंत्रणांनीच हे सर्व स्पष्ट केले असतानाही निवडणूकीच्या तोंडावर बदनाम करण्याची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे, असा आरोप महायुतीचे रायगड मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच या वर्तमानपत्राबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही तटकरेंनी दिला. "काही वर्तमानपत्रदेखील आपापल्या पक्षाची मुखपत्रे असतात, असावी लागतात. त्यात दुमत असण्याचे कारण नाही. पण तरीसुद्धा द्वेषाने कपोलकल्पित गोष्टी छापण्याची भूमिका घेतली जाते याचं वाईट वाटते," असे मत त्यांनी व्यक्त केले.

वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीविषयी तटकरे काय म्हणाले?

"आज कृषीवल वर्तमानपत्रात पहिल्या पानावर सिंचन घोटाळा प्रकरणी सुनिल तटकरे अडचणीत आले मग उच्च न्यायालयात धाव घेतली असे आले आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी एसीबीने उघडरित्या उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी केली. नागपूरच्या उच्च न्यायालयात माझ्यावर, अजितदादांवर जे काही आरोप करण्यात आले. त्याची उघड चौकशी होईल असे राज्य सरकारच्या वतीने नागपूरच्या उच्च न्यायालयात जाहीर केले गेले होते. त्याप्रमाणे एसीबीने सखोल चौकशीही केली होती. संबंध चौकशी पोलीस महासंचालक लाचलुचपत यांच्या देखरेखीखाली झाली होती. त्यात माझ्याशी संबंधित कोणताही विषय नव्हता. यासंदर्भात देखील सखोल चौकशी झाली. एसीबीच्या, सीबीआयच्या चौकशीत सर्व पर्याय वापरून चौकशी झाली. त्यासंदर्भात एक एफआयआर ठाण्यात दाखल झाला. मात्र त्या एफआयआरमध्ये कुठेही माझं नाव नाही आणि नव्हते. त्यासंदर्भात चार्जशीटही दाखल झाली होती. त्यातही माझं कुठे नाव नव्हते. ज्यांच्या संदर्भात चार्जशीट दाखल करत स्पेशल एसीपी कोर्टात हा दावा चालला, त्या एसीपी कोर्टानेही ज्यांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केले. पण आता त्या सर्वांनाच क्लीनचीट दिली गेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये 'नॉट अ सिंगल फेल' एकही रुपया खर्च झाला नाही असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसतच नाही कारण तशा पद्धतीचा खर्चच झाला नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली.

बातमीसंदर्भात अब्रू नुकसानीचा दावा

"या सगळ्या बनावट आणि खोटी कारणे पुढे करत बातमी करण्यात आली आहे. वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसंदर्भात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल. सिंचन घोटाळ्याप्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन कुठेही माझे नाव नाही. आणि ज्यांच्या विरोधात होते त्यांचे ते प्रकरण कोर्टात चालून त्यांनाही कोर्टाने दोषमुक्त केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आरोप केला होता. तरीसुद्धा जनतेने मला स्वीकारले. माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती असल्यानेच जनता माझ्या पाठीशी आहे," असेही तटकरे म्हणाले.

"वैचारिकदृष्ट्या कुठे चाललाय माझा महाराष्ट्र?"

"माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची भाषणे होणे स्वाभाविक आहे. निवडणुकांमध्ये संसदीय लोकशाही प्रणाली अभिप्रेत आहे. पण टीका करताना वस्तुस्थितीवर आधारित आणि सभ्यतेने व्हावी अशी अपेक्षा असते. अलीकडे गलिच्छ शब्दांमध्ये टीका-टिप्पणी केली जाते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. देशाचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्याबद्दल वापरली जाणारी वाक्ये, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केली जाणारी वक्तव्ये ऐकल्यानंतर वैचारिकदृष्ट्या कुठे चाललाय माझा महाराष्ट्र अशा प्रकारच्या वेदना मनामध्ये होतात," असे सुनिल तटकरे म्हणाले.

Web Title: Lok Sabha Election 2024 Maharashtra Raigad Sunil Tatkare says he is innocent and no connection to Irrigation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.