मुंबईतील ३४०० एकर जमिनीचा एकमेव मालक कोण?; ज्यांच्या जागेतून बुलेट ट्रेन जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:51 PM2024-01-04T14:51:12+5:302024-01-04T14:55:21+5:30

देशाच्या वेगाने होत असलेल्या आर्थिक प्रगतीमध्ये जमीन ही सर्वात मौल्यवान वस्तू बनत आहे. व्यावसायिक उपक्रम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जमिनीची मागणी वाढत आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशात जमिनीच्या किमती वेगाने वाढत आहेत.

आज परिस्थिती अशी आहे की दिल्ली-मुंबई किंवा बी दर्जाच्या शहरांमध्ये आणि अगदी जिल्हा स्तरावरही जमिनीचा तुकडा विकत घेणे सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यात मुंबईसारख्या शहरात एखाद्या व्यक्तीची सुमारे ३४०० एकर जमीन असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणाल?

एका रिपोर्टनुसार, मुंबईत एकूण राहण्यायोग्य जमीन केवळ ३४००० एकर आहे, तर शहराची लोकसंख्या सुमारे दोन कोटी आहे. यापैकी केवळ एका व्यक्तीकडे सुमारे ३४०० एकर म्हणजे एकूण जमिनीच्या १० टक्के जमीन आहे. हे एकटेच नाही तर शहरात आणखी काही 'मालक' आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या जुन्या अहवालानुसार, मुंबईतील एकूण ३४ हजार एकर जमिनीपैकी २० टक्के म्हणजे सुमारे ७ हजार एकर जमीन नऊ लोकांच्या मालकीची आहे.आज आपण ज्या जमीन मालकाबद्दल बोलत आहोत, त्यांच्या जमिनीची किंमत ४ लाख कोटींहून अधिक आहे. त्यांच्या जमिनीच्या मधोमधून बुलेट ट्रेन जाणार आहे.

त्या मालकाचं नाव आहे गोदरेज घराणे, जे देश-विश्वातील व्यापारी जगतात प्रसिद्ध आहे. परंपरेने गोदरेज कुटुंब लॉक बनवण्याचा व्यवसाय करत आहे. पण, सध्या हे कुटुंब एफएमसीजीपासून रिअल इस्टेटपर्यंत डझनभर क्षेत्रात व्यवसाय करत आहे. या मालमत्तेमध्ये समूहाचे प्रामुख्याने तीन भागीदार आहेत. गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदि गोदरेज, त्यांचा भाऊ नादिर गोदरेज आणि त्यांचा पुतण्या जमशेद गोदरेज हे आहेत. कुटुंबाची एकूण संपत्ती १.१२ लाख कोटी रुपये आहे. गोदरेज ग्रुपच्या अंतर्गत जवळपास १५ कंपन्या आहेत. हा देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योजकांपैकी एक आहेत

एवढी जमीन कुठून आली? - गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज यांचे आजोबा पिरोजशा गोदरेज यांनी ही जमीन खरेदी केली होती. गोदरेज ग्रुप हे पारशी कुटुंब असून ते कौटुंबिक व्यवसाय करतात. त्यांच्या अनेक पिढ्या ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळापासून अविरतपणे व्यवसाय करत आहेत.

दुसऱ्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश सरकारकडून तीन हजार एकर जमीन अवघ्या ३० लाख रुपयांना खरेदी केली होती. यानंतर त्यांनी आणखी ४०० एकर जमीन खरेदी केली. मात्र, या ३४०० एकरच्या मोठ्या भागावर बांधकामे होऊ शकत नाहीत. मुंबईच्या पर्यावरणाच्या दृष्टीने ही जागा महत्त्वाची आहे.

अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गोदरेज समूहाची ९.६९ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्याबाबत महाराष्ट्र सरकार आणि कंपनी यांच्यात दीर्घ न्यायालयीन लढा सुरू होता. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोदरेज समूहाला २६४ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले. मात्र, ही रक्कम बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

मुंबईत कुठल्याही व्यक्तीला एक छोटं घर बांधणेही सर्वात कठीण काम असते. यामागे मुख्य कारण म्हणजे इथं जमीन कमी आहे. रिपोर्टनुसार, मुंबईच्या २ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३४ हजार एकर जमीन आहे. यातील मोठया प्रमाणात जमिनीवर झोपडपट्टीवासीय व बड्या व्यावसायिकांचा ताबा आहे.

मुंबईतील गोदरेज कुटुंबाव्यतिरिक्त एफई दिनशॉ ट्रस्टकडे ६८३ एकर, प्रतापसिंग सुरी वल्लभदास कुटुंबाकडे ६४७ एकर, जिजाभोव अर्देशीर ट्रस्टकडे ५०८ एकर, वाडिया कुटुंबाकडे ३६१ एकर, बायरामजी जिजाभोव ग्रुपकडे २६९ एकर, सर मोहम्मद के युसुफ यांच्याकडे २०६ एकर जमीन आहे आणि व्ही के लाल (कांदिवली) कडे ७० ते १०० एकर जमीन आहे. या सर्व लोकांच्या जमिनी एकत्र केल्यास सुमारे ७ हजार एकर जमीन येते.