Chhagan Bhujbal: इतकी संपत्ती आणली कुठून? अखेर छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:51 PM2022-10-13T19:51:27+5:302022-10-13T20:10:39+5:30

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्यासह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर दिग्गज नेते उपस्थित होते.

छगन भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त यावेळी दिग्गजांनी त्यांच्या भाषणात भुजबळांसोबतच्या आठवणी सांगितल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनीही छगन भुजबळ शिवसेनेत असतानाचे किस्से सांगितले. तसंच छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते तेव्हाच मुख्यमंत्रीही झाले असते, असंही म्हटलं.

महत्वाची बाब म्हणजे छगन भुजबळांनी आपल्या भाषणात यावेळी त्यांच्यावर नेहमी होणाऱ्या बेहिशेबी संपत्तीच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं. इतकी संपत्ती आली कुठून हे भुजबळांनी सांगितलं. "लोकं म्हणतात यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली. त्यांना मला सांगायचं आहे की, पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही भाज्या विकायचो. हळूहळू भाज्या कंपन्यांना विकण्याचं कंत्राट घेतलं होतं. आम्ही हळूहळू कंपन्या सुरू केल्या आणि त्यानंतर पैसा उभा राहिला", असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

माझी एकसष्टी शिवाजी पार्कमध्ये साजरी झाली होती, तेव्हा शरद पवार तर होतेच, तेव्हा फारुख अब्दुला यांनीही त्यावेळी आशिर्वाद दिले होते. आपण सर्वजणही आला असाल. पण त्यावेळी आलेल्या दोन व्यक्ती आज नाहीत. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख आज नाहीत, असं सांगत भुजबळांनी गोपीनात मुंडे आणि विलासराव देशमुखांची आठवण काढली.

"आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केलं होतं, पण व्यस्त कार्यक्रमामुळे ते आले नसतील. पण त्यांच्या शुभेच्छा असतील असं गृहित धरतो", असंही छगन भुजबळ म्हणाले.

"जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते", असं विधानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. "प्रत्येकाचंच वय वाढत असतं. पण बाळासाहेब सांगायचे वयानं माणूस मोठा होत असतो. पण ज्याक्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो. त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसं आहे. नुसतं तरुण मनाचं असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इर्ष्या असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मला एकदा एवढी दाढी का ठेवता असंही विचारण्यात आलं होतं. पण सध्या देशात आणि राज्यात दाढीवाल्यांचं राज्य आहे म्हणून दाढी ठेवतो असं उत्तर दिल्याची आठवण सांगत भुजबळांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

"माझ्या मोठ्या भावाने खूप कष्ट घेतले. भाजी आणून माझगावच्या फूटपाथवर आम्ही विकायचो. खूप काही सहन केले, हळूहळू व्यवसाय वाढत राहिला.. भाऊ पहाटे तीन वाजता जायचा, मी पाच वाजता जायचो. त्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्याचे कँट्रॅक्ट मिळायला लागले. ट्रक भरुन भाजी पाठवू लागलो. खूप कष्ट घेतले अन् लोक म्हणतात, येवढी संपत्ती कुठून आणली?", असं छगन भुजबळ म्हणाले.