Sharad Pawar : '... म्हणून १४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:44 PM2022-01-13T20:44:06+5:302022-01-13T21:02:05+5:30

मुंबईत आज परभणी, वर्धा, नांदेड, पुणे येथील अनेक भाजप, वंचित आणि आरपीआयच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आज लोक हळुहळु या विचारावर यायला लागले आहेत. गेल्या आठवड्यातील उत्तरप्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसापूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तरप्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही.

पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.

मला खात्री आहे की, जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या पिढीला, सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन एक प्रभावी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न होईल.

या कामात विजय गव्हाणे यांची साथ मिळेल. विजय गव्हाणे हळुहळु चुकीच्या विचारांकडे जे लोक गेले आहेत. त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणतील.

परभणी जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते आज उपस्थित आहेत. यांच्या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाने परभणी जिल्हा प्रागतिक विचारांचा जिल्हा राज्याला दिसेल. तसेच उर्वरीत महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार मजबूत करण्याचे काम होईल, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता. त्याच्या पुर्वसंध्येला आज प्रदेश कार्यालयात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे.

फुले-शाहू-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आधारीत समाजकारण करण्याची आवश्यकता आहे. त्याला शक्ती देण्याचा निर्णय आज सहकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे पवार यांनी सांगितले.

परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा आहे. राजकीयदृष्ट्या जागरूक जिल्ह्यांपैकी एक असलेला हा जिल्हा. एक काळ असा होता १९४७-४८ साली परभणीतील एक मोठा वर्ग काँग्रेस सोबत होता. त्यानंतर जिल्ह्याने एका नव्या पक्षाला साथ दिली, तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष.

अण्णासाहेब गव्हाणे हे परभणीसह मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, राज्याच्या विधीमंडळातील एक प्रभावी नेते होते. अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले.

घरोघरी प्रागतिक विचार पोहोचवण्यात हे नेतृत्व यशस्वी झाले होते. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेले परभणीकर आणि परभणीचे सर्व सहकारी यांनी हा प्रागतिक विचार घेऊन पुढे आले, त्यापैकीच एक आक्रमक नेतृत्व म्हणजे विजय गव्हाणे असेही शरद पवार म्हणाले.