Devendra Fadanvis: फडणवीसांना गणितात भोपळा, वर्गातला बेस्ट फ्रेंड अन् शाळेत झालेली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 05:58 PM2022-11-14T17:58:34+5:302022-11-14T18:19:29+5:30

राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनुसार ते बदलत गेले असाही प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे.

राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनुसार ते बदलत गेले असाही प्रश्न अनेकांना पडणं साहजिक आहे.

मात्र, आपण लहानपणी शाळेतील शिक्षकांना बरा वाटायचो, असा विद्यार्थी होतो, असे फडणवीस यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर बाल दिनाच्या निमित्ताने फडणवीसांनी मुंबईतील एका शाळेत जाऊन बालमित्रांशी गप्पा मारल्या. त्यावेळी, बालपणीच्या आठवणीत ते रममाण झाले होते.

फडणवीसांना बालमित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नावर फडणवीसांनीही अगदी लहानपण देगा देवा... अशा बालमित्रांसोबत एकरुप होऊन प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, लहानपणी आपणास क्रिकेट हाच खेळ सर्वाधिक आवडायचा पण मी सगळेच खेळ खेळायचो, असे त्यांनी सांगितले.

बालपण म्हटलं माझी शाळा मला आठवते. बालपणी मी नागपूरच्या सरस्वती विद्यालयात शिक्षण घेतलं. आपली शाळा आपल्याला खूप काही शिकवत असते, आपलं व्यक्तिमत्व शाळेच्या शिक्षणातूनच घडतं.

मी शाळेत असताना अतिशय शांत विद्यार्थी होतो, थोडा उंच असल्याने मला शेवटच्या बाकावरच बसावं लागायचं, त्यामुळे मी लास्ट बेंचर्स होतो. शिक्षकांना बरा वाटेल असा विद्यार्थी मी होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीसांनी बालपणीच्या आठवणी सांगताना शाळेमधील इतिहासाला उजळणी दिली

माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड हा अल्हाद अजय असून तो मुंबईत आर्कीटेक्ट आहे. तो लहानपणी माझ्यासोबत माझ्या बँचवर बसायचा. पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही दोघेच शेवटच्या बँचवर बसायचो. आम्ही दोघांनीही शेवटच्या बँचवर कोणाला बसू दिलं नाही.

कुठलीही भेसळ नसेलेलं प्रेम हे बालपणीच्या मित्रांमध्ये पाहायला मिळतं. मी आजही माझ्या बालपणीच्या मित्रांना भेटतो, कारण बालपणीची मैत्री ही निस्वार्थी असते. त्या मित्रांपैकी कोणी मोठं होतं, कोणाला मोठं होत येत नाही.

कोणी सेटल होतं, कोणाला सेटल होता येत नाही. पण, बालमित्र हे स्वार्थी नसतात. म्हणून आपल्याला अगदी चांगला वेळ कोणासोबत घालवता येत असेल तो बालमित्रांसोबतच, असे फडणवीस यांनी म्हटले.

शाळेतील युनीट टेस्ट म्हणजेच चाचणी परीक्षेत गणितात शुन्य मार्क मिळाले असे आम्ही १७ विद्यार्थी होतो. आमच्या सरांनी १७ जणांना समोर बसवलं आणि पुढील चाचणी परीक्षेपर्यंत ते वर्गात आले की फळ्याखाली जमिनीवर आम्हाला बसावं लागायचं.

ते आम्हाला गणित शिकवायचे, पण त्याचा फायदा असा झाला पुढच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले आणि गणितही सुधारलं, असा शाळेतील शिक्षेचा किस्सा फडणवीसांनी सांगितला.