जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 18:21 IST2018-10-15T18:03:54+5:302018-10-15T18:21:49+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या प्रयत्नातील फोलपणा उघड केला आहे.

जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थिती ओढवू नये म्हणून राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. दरम्यान, मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे.
जलयुक्त 'शिव्या'र या नावाने प्रसिद्ध केलेल्या आजच्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी राज्यात 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचा फोलपणा मांडला आहे. तसेच सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील महाराष्ट्र तहानला आहे, असा टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी याआधीही दुष्काळी परिस्थितीवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुंचल्यातून फटकारे चालवले होते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्यपरिस्थीती असल्याचे राज यांनी आपल्या चित्रात दर्शवले तर मुख्यमंत्र्यांकडे वैचारिक दुष्काळ असल्याचे म्हटले होते.
लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दाखवले होते. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले होते. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले होते.