'महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:53 AM2021-09-14T11:53:35+5:302021-09-14T11:55:06+5:30
मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर भातखळखर यांनी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
![Dhananjay Munde, Sanjay Rathore and Mehboob Sheikh, who are accused of exploiting women, are foreigners?, bjp atul bhatkhalkar questioned | 'महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत का?' Dhananjay Munde, Sanjay Rathore and Mehboob Sheikh, who are accused of exploiting women, are foreigners?, bjp atul bhatkhalkar questioned | 'महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत का?'](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/catsdmie_202109688473.jpg)
'महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत का?'
मुंबई - साकीनाका परिसरात महिलेवर झालेला बलात्कार आणि उपचारादरम्यान झालेला तिचा मृत्यू यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. तसेच, परप्रातीयांची नोंद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यावरुन, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये असलेला सहभाग पाहता मुख्यमंत्र्यांनी याबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सूचनेनंतर भातखळखर यांनी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
'परप्रांतियांची नोंद ठेवा' असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलंय. बलात्कारी दरिंद्यांची कुठली जात, धर्म आणि भाषा असते का?, असा प्रश्न भातळखकर यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच, महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड,मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत का?, असेही ते म्हणाले.
पोलिस अधिकाऱ्यांना सूचना
'माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी गृह विभागाला पूर्ण पाठबळ देण्यात येईल. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.
राज ठाकरेंनी अनेकदा केली होती सूचना
राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवा. ते कुठून येतात, कुठे जातात याचा तपशील पोलिसांकडे असायला हवा, असं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून म्हणत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील लाखो परप्रांतीय त्यांच्या गावी परतले. त्यावेळीही राज ठाकरेंनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. परप्रांतीय मोठ्या संख्येनं त्यांच्या घरी परतले होते. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर ते पुन्हा महाराष्ट्रात येतील. तेव्हा त्यांची नोंद ठेवा, असं राज यांनी म्हटलं होतं.