Join us  

वजन भरमसाठ वाढलं, अचानक वाढलं तर त्याचा मानसिक आरोग्यावर होतो दुष्परिणाम, रिसर्चचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 1:55 PM

वजन आणि शरीरातील चरबी वाढल्यानं रक्तदाब, हदयाशी संबंधित समस्या , मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका असतो. पण हे आजार शरीराशी संबंधित आहे. पण वजन वाढल्यानं शारीरिक आजारांसोबतच मानसिक आजारही उद्भवतात. याला अभ्यासक स्थूलतेमुळे निर्माण होणारा ‘जुळा आजार’ असं संबोधतात.

ठळक मुद्देवजन वाढण्याचा त्रास शारीरिक स्तरासोबाच मानसिक स्तरावरही जाणवतो.वजन वाढलं की लोकं बोलतात, टोकतात, टोमणे मारतात, वजन कमी करण्याचा सारखा सल्ला देत रहातात. याचा त्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो.वजन वाढल्याने नकारात्मकता निर्माण होते, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होतो.छायाचित्रं:- गुगल

आपलं वजन वाढतंय किंवा वजन वाढलेलं आहे याचाच अर्थ आपण फिट नाही. वजन वाढणं ही केवळ एक प्रक्रिया नसून ती आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. या वजन वाढीचा आपल्या शारीरिक आरोग्यावर जितका परिणाम होतो तितकाच मानसिक आरोग्यावरही होतो . ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ ने नुकतंच स्थूलतेला आजार म्हणून संबोधलं आहे.वजन आणि शरीरातील चरबी वाढल्यानं रक्तदाब, हदयाशी संबंधित समस्या , मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका असतो. पण हे आजार शरीराशी संबंधित आहे. पण वजन वाढल्यानं शारीरिक आजारांसोबतच मानसिक आजारही उद्भवतात. याला अभ्यासक स्थूलतेमुळे निर्माण होणारा ‘जुळा आजार’ असं संबोधतात.  ‘अपोलो स्पेक्ट्रा नेहरु एन्क्लेव’येथील जनरल सर्जन डॉ. कपिल अग्रवाल यांनी वजन वाढ आणि त्याचे मानसिक परिणाम याबाबत सविस्तर विश्लेषण केलं आहे. बदलती जीवनशैली- वजन वाढ- शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरचे दुष्परिणाम हे एक चक्र आहे. हे चक्र भेदण्याचे मार्गही त्यांनी सांगितले आहेत. 

 छायाचित्र:- गुगल

स्थूलता आणि मानसिक आरोग्य

नकारात्मकता वाढते

वजन वाढण्याचा त्रास शारीरिक स्तरासोबाच मानसिक स्तरावरही जाणवतो. एकतर आपलं वजन वाढलं याचा त्या व्यक्तीला स्वत:ला ताण येतो, कमीपणा वाटतो, न्यूनगंड निर्माण होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजनव वाढलं की लोकांचे टोमणे मारणे, सल्ले देणे सुरु होते. आजही व्यक्तीची सुंदरता मोजण्याचं परिमाण रंग आणि शरीराचा आकार आहे. वजन वाढणं म्हणजे सुंदर नसणं हा समज त्यातूनच निर्माण झालेला आहे. स्माजात या समजाचं वर्चस्व इतकं आहे की ती व्यक्ती वजन वाढलं म्हणून स्वत:च स्वत:ला कुरुप समजायला लागते. त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. आपण इतरांसारखे नाही, आपल्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव त्यांचं मन कुरतडते. यामुळे त्यांच्यात असलेला आत्मसन्मान कमी होतो . स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्या व्यक्तीमधे नकारात्मकता आणि भीती निर्माण होते.

विमनस्कता अर्थात डिप्रेशन जडतं

वजन वाढलं की लोकं बोलतात, टोकतात, टोमणे मारतात, वजन कमी करण्याचा सारखा सल्ला देत रहातात. डॉ. कपिल म्हणतात की याचा त्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो. आपलं वजन वाढतंय, आपल्याला ते लवकरात लवकर कमी करायला हवं हे विचार त्यांच्यात मानसिक तणाव निर्माण करतात. त्याचा त्यांच्या मनावर दबाव निर्माण होतो. या मानसिक ताणानं आणि दबावानं त्या व्यक्तीस डिप्रेशन हा मानसिक आजारही जडू शकतो.

 छायाचित्र:- गुगल

लैंगिक संबंधावर परिणाम

स्थूलता ही अशी समस्या आहे जिचा आपल्या जगण्याच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो. स्थूलतेमुळे शारीरिक क्षमता कमी होतात. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा आणि क्षमता कमी होते. स्थूलतेमुळे या संबंधातून मिळणारा आनंद घेता येत नही. या गोष्टीमुळेही मानसिक ताण वाढतो. यासंबंधी झालेल अभ्यास सांगतो की स्थूलतेचा लैंगिक संबंधावर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारं डिप्रेशन ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमधे जास्त जाणवते.

सकारात्मक विचार आणि प्रयत्न गरजेचे

स्थूलतेमुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम बघता स्थूल असलेल्या व्यक्तींनी याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करुन त्याबाबतीत प्रयत्न करायला हवेत असं डॉ. कपिल अग्रवाल म्हणतात. आपलं वजन वाढतं तेव्हा आपण स्वत:ला दोष देण्यात अर्थ नसतो. कारण कोणी मुद्दाम स्वत:ला स्थूल करुन घेत नाही. स्थूलतेला अनुवांशिकता, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, सदोष जीवनशैली, कमी झोप, भावनिक समस्या, शारीरिक आरोग्याच्या समस्या, दिवसभर शरीराची हालचाल कमी असणं, आळशी असणं किंवा गरोदरपण यामुळे वजन वाढतं. त्यामुळे सतर्क राहून वजन वाढू देवू नये किंवा जर वाढलंच तर त्यामागील कारणं शोधून ते कमी करण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक आरोग्य चांगलं रहातं.

 छायाचित्र:- गुगल

वजन कमी करताना

* आरोग्यदायी वजन ठेवण्यासाठी किंवा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्या डॉक्टरांशी बोलावं.*  मसालेदार, तेलकट आणि जंक फूड खाऊ नये.* साखर आणि गोडाचे पदार्थ कमी खावेत किंवा अगदी टाळावेत.* आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करावा. रोज किमान 40 ते 45 मिनिटं व्यायाम करावा.* चालणं, पळणं, पोहोणं, सायकल चालवणं, योग करणं, जिमला जाणं किंवा नृत्य, झुम्बा यासरख्या मार्गांचा अवलंब करुन वजन नियंत्रित ठेवणं* रात्री पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.* अति स्थूलता असेल तर बेरियाट्रिक शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे पण तो डॉक्टरच सुचवतात.* जीवनशैलीत आरोग्यदायी बदल केल्यास वजन नियंत्रित राहातं किंवा खात्रीनं कमी होतं.