Join us  

नवरा बायकोच्या नात्यात 'भांडणाची' सुरुवात नेमकं कोण करतं? कुरापत कोण काढतं 'तो' की 'ती'?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 2:19 PM

ऑफिसातून यायला एवढा उशिर का झाला?हा साधासरळ वाटणारा प्रश्न पण बायको तो अशा सुरात विचारते की,जणू नवर्‍यानं मोठी चूकच केली!नवराही बायकोच्या त्या प्रश्नाचाअसा अर्थ लावतो की,ही आपल्याला जाबच विचारतेय,संशय घेतेय!ठिणगी पडतेच भांडणाची!

ठळक मुद्दे बायकांना जशी मान्यतेची गरज वाटते तशीच गरज पुरुषांना पसंतीची वाटते. पुरुषाचे त्याच्या पत्नीवर जेवढं अधिक प्रेम असेल तेवढी त्याला तिच्या पसंतीची अधिक गरज वाटते.जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांचे दृष्टिकोन मान्य करतील. एकमेकांशी आस्थेनं बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद उरणारच नाही.

 -शुभदा विद्वांस

नवरा बायकोच्या भांडणात वादाला सुरूवात कोण करतो हा संशोधनाचा विषय असतो. थोडसं संशोधन केलं तरी बर्‍याच भांडणात भांडणाला सुरूवात करण्यासाठी बायकाच पुढाकार घेताना दिसतात. त्याही जाणून बूजून नव्हे तर नकळतपणे वादाला सुरूवात करतात. आपल्या भावना आवडी-निवडी, निराशा स्त्रिया स्पष्ट शब्दात व्यक्त करत नाहीत. त्याऐवजी नाटकी स्वरुपात प्रश्न विचारतात आणि नकळतपणे आपली नापसंती वेगळ्या पद्धतीनं पोहोचवतात. परंतु पुरुषांपर्यंत त्याचा चुकीचा संदेश जातो. उदाहरणार्थ जर नवर्‍याला घरी यायला उशीर झाला तर बायको त्याला विचारते, ‘ तू इतका उशीर करुच कसा शकतोस?’ किंवा ‘तू फोन का नाही केलास?’ बायकोच्या या बोलण्यातून नवर्‍याला असा संदेश मिळतो की, ‘तू उगाच थापा मारु नकोस. कोणतंही संयुक्तीक कारण तुझ्या उशीरा येण्यामागे नाही. तू बेजबाबदार आहेस’‘तू फोन का नाही केलास?’ असा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही पण केव्हा जेव्हा बायकोला खरोखर नवर्‍याच्या उशिरा येण्यामागचं कारण जाणून घ्यायचं असेल तेव्हा. पण बायको जेव्हा चिडलेली असते तेव्हा तिला फोन न करण्यामागचं कारण जाणून घेण्यात काहीच रस नसतो तिला फक्त तिचा मुद्दा सिद्ध करायचा असतो की तुमच्या उशिरा येण्यामागे कोणतंही स्वीकारार्ह कारण नाही.पुरुषाला त्या प्र्श्नामागच्या तिच्या भावना समजत नाही उलट तिची नापसंतीच त्याच्यापर्यंत पोहोचते. त्याला जबाबदार धरण्याची तिची आगंतूक इच्छा त्याच्या डोक्यात जाते. मग त्याला एकदम आपल्यावर कोणीतरी हल्ला करते आहे असे वाटते आणि मग तो बचावात्मक पवित्रा घेतो आणि एखादं तिरसट उत्तर देतो,‘हो ना! बॉसनं मला जेवायला ठेवून घेतलं होतं.’

 

आधी प्रेम मग तिरस्कार असं का?

बायकांना जशी मान्यतेची गरज वाटते तशीच गरज पुरुषांना पसंतीची वाटते. पुरुषाचे त्याच्या पत्नीवर जेवढं अधिक प्रेम असेल तेवढी त्याला तिच्या पसंतीची अधिक गरज वाटते. नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या काळात दोघंही एकमेकांच्या गरजा पुरवत असतात ज्या पुरुषाला पत्नीकडून अशी खास पसंती मिळत असतांना अचानक तिनं ती काढून घेतली तर ते त्याच्यासाठी फार दु:खद असू शकतं. बायका मात्र या बाबतीत फारच अनभिज्ञ असतात आणि आपलं हेच वागणं बरोबर आहे अशी त्यांची खात्री असते. पुरुषांना हृदयसिंहासनावर बसवणं हे त्यांच्यासाठी किती गौरवाचं असतं व हृदयसिंहासनावरुन खाली उतरवणं किती अपमानास्पद असतं याची बायकांना कल्पना नसते.नातेसंबंध सुरुवातीच्या काळात इतके यशस्वी का असतात याचं एक कारण असं की, अजूनही तो तिच्यासाठी कोणीतरी खास असतो, तिच्यासाठी तो तेजानं तळपणारा शूरवीर असतो त्याला तिची पसंती मिळण्याचं भाग्य लाभतं. ज्यामुळे तो हवेत तरंगतो पण ज्या क्षणी त्याच्या प्रती असलेली तिची पसंती ना पसंतीमध्ये बदलते आणि अचानक त्याची रवानगी तिच्या परिघाच्या बाहेर जाते. स्त्रिया सहसा त्याच्या वागणुकीसंबंधीची उलटतपासणी इतक्या नापसंतीनं करतात त्यामुळे तो जखमी होतो. स्त्रिया हे हेतूपरस्पर करतात कारण त्यामुळे आपण त्याला धडा शिकवला असे त्यांना वाटते. पण हे खरं नसतं. त्यामुळे फक्त भीती आणि संताप निर्माण होतो आणि हळूृहळू पुरूष अधिक निष्क्रिय बनत जातो.

 

वादाची खरी सुरूवात

जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांचे दृष्टिकोन मान्य करतील. एकमेकांशी आस्थेनं बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद उरणारच नाही. आपल्यातील मतभेद ते योग्य प्रकारे चर्चा करुन मिटवतील. पण बहुतेकवेळा असं होतंच नाही.जेव्हा एखादा पुरुष एखादी चूक करतो किंवा एखादी गोष्ट करायला विसतो किंवा एखादी जबाबदारी पार पाडणं त्याला जमत नाही तेव्हा स्त्रीच्या हे लक्षात येत नाही की, तो किती हळवा झाला आहे! खरंतर अशा वेळी त्याला प्रेमाची सर्वात जास्त गरज असते. परंतु अशा वेळी स्त्रिया आपली नापसंती नजरेतून आणि स्वरांमधून त्याच्यापर्यंत पोहोचवतात कदाचित तिचे शब्द फारसे वाईट नसतीलही पण तिची नजर आणि तिचा स्वर पुरुषाला विद्ध करणारा असतो. मग त्यानं बचावात्मक पवित्रा घेतला तर त्याचं काय चुकतं? तो तिचं बोलणं हाणून पाडण्यासाठी तिची मतं चुकीची ठरवून स्वत:चं सर्मथन करतो.आणि मग ठिणगी पडते!shubhada.vidwans@gmail.com