Join us  

दु:ख कुणाला चुकलंय, त्यातून जावंच लागतं प्रत्येकाला!- अनुष्का शर्मा सांगतेय वेदना होतात तेव्हा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 2:48 PM

अनुष्का शर्माच्या समाज माध्यमांवरील पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकत्याच अनुष्कानं इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एक कवी हुसेन मन्वर यांचं दुखा:बद्दलचं ट्वीट तर एका पोस्टमधे अल्बर्ट आइनस्टाइन यांच टीकेबद्दलचा कोट पोस्ट केला आहे. हे ट्वीट पोस्ट करुन दुखाशी आणि टीकेशी लढण्याच्या ताकदीकडे अनुष्का लक्ष वेधत आहे.

ठळक मुद्देअनपेक्षित दु:खाशी लढण्याचं कौशल्य हे शाळेच्या पातळीवर शिकवायला हवं.  माणसं दु:खाने आणि टीकेने कोलमडतात, खचतात. दु:ख, टीका या दोन गोष्टी अशा आहेत ज्याचा सामना जगातल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात करावाच लागतो.

अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील मोजक्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे जी समाजमाध्यमांवर अर्थपूर्ण, वाचणार्‍यांना विचार करायला लावणार्‍या पोस्ट टाकत असते. एखाद्या समस्येशी कसं सकारात्मकतेनं लढायचं याचे मार्गही ती तिच्या अनुभवातून शेअर करत असते. म्हणूनच अंतर्मुख करणार्‍या अनुष्का शर्माच्या समाज माध्यमांवरील पोस्ट नेहेमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकत्याच अनुष्कानं इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एक कवी हुसेन मन्वर यांचं दुखा:बद्दलचं ट्वीट तर एका पोस्टमधे अल्बर्ट आइनस्टाइन यांच टीकेबद्दलचा कोट पोस्ट केला आहे. हे ट्वीट पोस्ट करुन दुखाशी आणि टीकेशी लढण्याच्या ताकदीकडे अनुष्का लक्ष वेधत आहे.

Image: Google

गेल्या दिड दोन वर्षांचा काळ जगातल्या संपूृर्ण मानवजातीसाठी आव्हानात्मक आणि संघर्षमय ठरला. अनेकांच्या गाठील या काळानं आयुष्यभर पुरेल एवढं दु:ख दिलं. माणसाच्या आयुष्यावर अनपेक्षितपणे वाट्याला येणारे दु:ख, आघात हे नेहमीच खोल परिणाम करतात. कारण या दुखांची माणसाला मुळात कल्पनाच नसते. आपल्याकडे सगळं शिकवलं जातं. पण दुखाशी, हदयाला झालेल्या वेदनेशी कसं लढावं, त्याचा सामना खंबीरपणे, स्वत:चा तोल ढळू न देता कसा करावा याचं शिक्षण दिलं जात नाही. हे शिक्षण वाढत्या वयात नाही तर मुलांना लहानपणापासूनच मिळायला हवं. म्हणजे माणसं अचानक आलेल्या दुखापुढे कोलमडून पडत नाही.

अनुष्का शर्मानं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेलं हुसेन मन्वर यांचं ट्वीट दु:ख, वेदना, हदयात खोलवर झालेली जखम यावरच भाष्य करतं. या ट्वीटमधे कवी हुसेन मन्वर म्हणतात की, जगातला प्रत्येकजण दुखा:शी, शोकाशी, वेदनेशी लढत असतो. या प्रत्येकाला या लढ्यासाठी शुभेच्छा. दुखाशी कसं लढायचं हा विषय शाळेत शिकवायलाच हवा. हा धडा टोकाच्या वेदनेशी, दुखाशी लढताना आपल्याला तयार करण्यास नक्कीच मदत करणारा ठरु शकेल.इन्स्टाग्रामवरील आपल्या दुसर्‍या पोस्टमधे अनुष्का अल्बर्ट आइनस्टाइन यांचा कोट शेअर करते. या कोटमधे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणतात की , ‘महान आत्म्यांना नेहमीच साधरण मनोवृत्तीच्य माणसांच्या हिंसक विरोधाचा, टीकेचा सामना करावा लागतो.’

Image: Google

माणसं जितकी स्वत:च्या वाट्याला आलेल्या अनपेक्षित दु:खाने खचतात तितकेच लोकांच्या जहरी टीकांमुळेही त्यांचं मनोबल खचतं. आपलं उद्दिष्ट जर नेक असेल , त्यासाठीचे प्रयत्न हे जर प्रामाणिक असतील तर लोकांच्या टीकेला भीक घालण्याची गरजच काय? असा सवाल जगभरातल्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी, विचारवंतांनी, कलाकारांनी, लेखक, कवींनी आणि शास्त्रज्ञांनीही उपस्थित करुन मन खच्ची करणार्‍या टीकांकडे दुर्लक्ष करण्यास सूचवलेलं आहे.

Image: Google

दु:ख आणि टीका या दोन गोष्टींच्याबाबत जगातील सर्व माणसं एकसमान असतात. या दोन्ही गोष्टींचा सामना जगातल्या प्रत्येकाला कधी ना कधी करावाच लागतो. त्याच्याशी लढण्याची ताकद ज्याच्याकडे असते तो तरुन जातो, पुन्हा नव्या उमेदीनं उभा राहू शकतो. नाहीतर खचणं, कोलमडणं अपरिहार्य आहे. दु:ख आणि टीका यांच्याशी लढण्याची ताकद म्हणजेच हे एक मानसिक कौशल्य आहे. हे कौशल्य शालेय पातळीवर शिकायला मिळालं तर मानसिकरित्या कणखर समाज घडेल. हेच कवी हुसेन मन्वर यांना आपल्या ट्वीटमधून सुचवायचं आहे, हेच अल्बर्ट आइनस्टाइन यांनी आपल्या कोटमधून सूचवलं आहे. या दोघांचे ट्वीट आणि कोट आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करुन अनुष्का शर्मा देखील दु:ख, टीका यांच्याविरुध्द लढण्याच्या ताकदीकडे आपलं लक्ष वेधते आहे.

एकदा प्रत्येकानं खरंच स्वत:मधे डोकावून बघाच की भविष्यात एखादा अनपेक्षित दु:खाचा प्रसंग आला तर त्याला सामोरं जायाला आपल्याकडे ताकद आहे का? ती नसेल तर ती कमावण्याचा मार्ग आताच शोधून ठेवा. कारण आपल्या जगण्यात आनंदा इतकंच दु:खही अपरिहार्य आहे!