Join us  

Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही!

By meghana.dhoke | Published: July 24, 2021 1:11 PM

वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्टर स्टार. तिनं  देशासाठी ऑलिम्पिक पदक यंदा जिंकणारच हा शब्द खरा केला..(India at Tokyo Olympics 2021)

ठळक मुद्देती म्हणाली, ‘सोच लिया था अब की बार, बस. वो ही ड्रिम है!’

मेघना ढोके

वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्ट स्टार. भारताला २०२१ चं पहिलं ऑलिम्पिक पदक, (tokyo olympics 2021) रौप्य पदकाची कमाई तिनं करुन दिली..  यंदा ऑलिम्पिक मेडल जिंकायचंच हे स्वप्न पूर्ण केलं.  स्वत:च्या गुणवत्तेचं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याचं स्वप्न जे कधीकाळी तिनं मणिपू्रच्या गारठवून टाकणाऱ्या गल्लीत, कर्फ्यू लागलेल्या शहरातल्या भयाण शांततेत स्वत:त मुरवलं होतं. ते ती आज पुन्हा जगली. खरंतर आजवर ती अनेक स्पर्धा जिंकली. २०१७ मध्ये वर्ल्ड चॅम्पिअनशिपही जिंकली. पण त्यावेळेसही तिच्या डोळ्यासमोर ऑलिम्पिक मेडलसाठीची तयारी कायम होती.ही मुलगी बोलते फार कमी. हसरी. मात्र तिची जिद्द अशी की, सारा भार स्वत: तोलून धरत ती देशासाठी पदकाची स्वप्न पाहते..गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आलं.तेव्हा तिला फोन केला होता की, ऑलिम्पिक क्वालिफाय झाल्यावर हा ब्रेक, त्या झोनमध्ये असलेल्या खेळाडूला किती कठीण असेल स्वत:ला सावरुन धरणं..ती हसली, म्हणाली, बहौेत टाइम मिला है अभी तयारी को.. मेहनत करेंगे और क्या?ही मीराबाई. लहानपणी डोक्यावर लाकडाची जाडजूड मोळी सहज वाहून न्यायची. मोळी अशी जाडजूड की  तिच्या भावाला ती हलवणंही मुश्कील व्हायचं. तिथून या मुलीचा वेटलिफ्टिंगचा प्रवास सुरू झाला.  जागतिक दावेदारी सांगत ती म्हणता म्हणता चॅम्पिअन बनली. २०१४ पासून सुवर्णपदकं जिंकत मीराबाईनं वेटलिफ्टिंगमध्ये आपलं मानाचं स्थान निर्माण केलं आहे. देशातला क्रीडा  क्षेत्रातला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार भारत सरकारने तिला प्रदान करण्यात आला. आणि मग ती २०२० ऑलिम्पिक पदकावर दावेदारी सांगायला सज्ज झाली होती. मग कोरोना लॉकडाऊन सुरु झालं.तेव्हा तिला विचारलं की आता कशी चालली तयारी तर ती म्हणाली, ‘सोच लिया.. अब की बार, बस. वो ही ड्रिम है!’मात्र त्या स्वप्नाला वर्षभर टाळं लागलं. सारं जग निराश झालं.पण मीराबाईची दुनिया? त्या दुनियेत काहीही बदललं नाही.. ती अजिबात निराश, नाराज नव्हती. काही कुरकुरच नाही.

(फोटो-गुगल)

 

मीराबाई सांगत होती,  मै घर नहीं गया, नहीं गया इम्फाळ. पटियाला में कॅम्पमेंही हूं! ऑलिम्पिकच्या आधी मी खरं तर एशियन चॅम्पिअनशिपची तयारी करत होते. एकदम फोकस्ड, की बेस्ट परफॉर्मन्स करायचा. ऑलिम्पिक नहीं हुआ, बुरा तो फील होता ही है! पण मग काय उदास बसायचं का? जरा वेळ लागला समजायला की आता काय करायचं? समोर काही टार्गेटही नाही. मी जरा ब्लॅँकही झाले. एकाच खोलीत किती काळ बसणार? मग मात्र आम्ही पुन्हा तयारी लागलो. वेट ट्रेनिंग तर होतंच; पण फिटनेस ट्रेनिंगवर भर दिला. टेक्निकल ट्रेनिंगही सुरूच ठेवलं. कोच विजय शर्मा आमचं ट्रेनिंग करवत आहेत.'  आता मी स्वत:लाच सांगतेय की, आता आपल्याकडे वेळ आहे. अजून ट्रेनिंग करू, अजून मेहनत करू. बहौत टाइम है, बहौत मेहनत भी करेंगे. आराम केला लॉकडाऊनमध्ये थोडा, मात्र स्वत:ला फिट, फाइन, फोकस्ड ठेवणं. हेच आता महत्त्वाचं आहे. मुश्किले तो आती है.. आएगी.. पिछे थोडी ना हटेंगे!मीराबाईने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही!

टॅग्स :मीराबाई चानूटोकियो ऑलिम्पिक 2021