Join us   

केस गळतात म्हणून  अनुष्का शर्मानेही केला हेअर कट, बाळांतपणानंतर अनेकींना हा त्रास होतो, कारण.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 7:05 PM

बाळांतपणानंतर चांगले केस खराब झाले अशी अनेकींची तक्रार असते. हे असं का होतं, केस गळणं थांबवणं आपल्या हातात आहे का असा प्रश्नही अनेकजणी विचारतात. या प्रश्नांना उत्तरं आहेत. 

ठळक मुद्दे बाळांतपणात केस गळतात म्हणजे केसांची कायमस्वरुपी हानी होते असं नाही. बाळांतपणानंतर केस गळणं हे तात्पुरतं असतं.बाळांतपणानंतर होणारी केस गळती ही प्रामुख्याने हार्मोन्समधल्या बदलांचा परिणाम असून ही तात्पुरती असते. आहारात लोहाची , कॅल्शिअमची कमतरता, अँनेमिया आणि थायरॉइड ग्रंथीतील बदल ही कारणंही केस गळतींमागे असतात.

  बाळांतपणानंतर केस खूप गळताय म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मानं केस कापले आणि आपल्या नवीन लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. तिच्या नव्या हेअर स्टाइलचं कौतुक जरी होत असलं तरी बाळांतपणानंतर केस का गळतात हा प्रश्न उरतोच. या केस गळण्यावर काही उपाय आहेत का ? याच्या शोधातही महिला असतात. पण नेमकं उत्तर सापडत नाही. बाळांतपणानंतर चांगले केस खराब झाले अशी अनेकींची तक्रार असते. हे केस गळणं थांबवणं आपल्या हातात आहे का असा प्रश्नही अनेकजणी विचारतात. याबाबत पुणे येथील स्त्री रोग चिकित्सक डॉ. गीता वडनप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाळांतपणातल्या केस गळतीबाबत शास्त्रीय माहिती दिली आणि उपायांचीही चर्चा केली.

 

बाळांतपणानंतर केस का गळतात?

 

 

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात गर्भ वाढत असतो तेव्हा त्याची नीट वाढ व्हावी म्हणून स्त्रीच्य शरीरात अंर्तबाह्य खूप बदल होतात. स्नायुंमधे, हार्मोन्समधे खूप बदल होतात. आणि बाळ जन्माला आलं की शरीराची पूर्वस्थितीत येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरु होते. आईकडून बाळाचं पोषण होण्यासाठी बाळांतपणानंतर पुन्हा हार्मोन्सच्या पातळीवर बदल घडतात. त्याचा परिणाम म्हणजे स्त्रीच्या शरीरात आणि मानसिक स्थितीत खूप बदल होतात. काही बदल दिसून येतात तर काही दिसून येत नाही. बाळांतपणानंतर पहिल्यांदा आई होणार्‍या एकूण महिलांपैकी 13 टक्के महिलांमधे प्रचंड केस गळतीची समस्या दिसून येते. आणि 70 टक्के महिलांमधे बाळांतपणानंतर नैसर्गिकपणे केस गळण्याचं आढळून येतं.

पण बाळांतपणात केस गळतात म्हणजे केसांची कायमस्वरुपी हानी होते असं नाही. बाळांतपणानंतर केस गळणं हे तात्पुरतं असतं. केसांची झालेली हानी पुढे भरुन निघते. गरोदरपणात प्रोजेस्ट्रेरॉन हे हार्मोन जास्त स्त्रवतं. या हार्मोन्समुळे गर्भाशयाच्या स्नायुंना शिथीलपणा येतो आणि बाळाची वाढ व्यवस्थित होते. त्यासोबतच प्रोलॅक्टिन हार्मोनही वाढत असतं. पण प्रसूती झाल्यानंतर वाढलेल्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होते. पण प्रोलॅक्टिन मात्र वाढलेलंच राहातं. हार्मोन्समधल्या या बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक पातळीवर मोठे बदल झालेले दिसून येतात. केस गळण्यासाठी प्रामुख्याने इस्ट्रोजन हार्मोन कारणीभूत ठरतं. कारण बाळांतपणानंतर या हार्मोनची पातळी खालावते.

बाळांतपणानंतर होणारी केस गळती ही प्रामुख्याने हार्मोन्समधल्या बदलांचा परिणाम असून ही तात्पुरती असते. बाळांतपणानंतर पहिले चार महिने केस जास्त गळतात. कारण या काळात इस्ट्रोजन हे हार्मोन खूप कमी झालेलं असतं. चार महिन्यांपासून आठ महिन्यांपर्यंत केस गळतीचं प्रमाण थोडं कमी होतं आणि पुढे आठ महिन्यांपासून बारा महिन्यांपर्यत केस गळण्याचं थांबतं. स्त्रीच्या शरीरात गर्भ राहिला की लगेच हार्मोन्सच्या पातळीवर बदल घडून येतात. पण ते लगेच लक्षात येत नाही. पण बाळांतपणानंतर ते प्रभावीपणे जाणवतात. बाळांतपणानंतर आठ ते 12 महिने हे हार्मोंन्समधे बदल टिकून असतात.

हार्मोन्सच्या पातळीवर होणार्‍या बदलांसोबतच इतरही कारणांमुळे बाळांतपणानंतर केस गळतात. आहारात लोहाची , कॅल्शिअमची कमतरता, अँनेमिया आणि थायरॉइड ग्रंथीतील बदल ही कारणंही केस गळतींमागे असतात.

 तसेच तीशीनंतर उशीरा होणार्‍या बाळांतपणात केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण वयाच्या या टप्प्यात गर्भारपण आणि बाळांतपणात हार्मोनल बदल खूप मोठ्या प्रमाणात होतात.

 केस गळतीवर उपाय काय?

 

 

* सर्वात आधी बाळांतपणानंतर केस गळतात ही नैसर्गिक प्रकिया आहे आणि ती र्मयादित काळापुरती आहे हे समजून घ्यावं. सामान्यपणेही कोणाही स्त्रीचे 50 ते 150 केस गळणं हे नैसर्गिक समजलं जातं. नवीन केस येतात, खराब केस गळून जातात . काही केस रिस्टोअर फेजमधे असतात. बाळांतपणानंतर केस कोषातून केस सैल होतात आणि गळायला लागतात. त्यामुळे गळणार्‍या केसांची खूप चिंता करु नये.

*   केस हळुवार विंचरणे आवश्यक आहे. केस घट्ट बांधून ठेवू नये.

*  तीव्र रसायनांचा शाम्पू वापरु नये. सौम्य शाम्पू वापरायला हवा. रसायनांमुळे केसांची मुळं आणखी कमजोर होवून केस गळती वाढते.

* केस खूप गळत असल्यास ते थोडे कापावे. त्यामुळे केस गळती कमी होते.

* खोबर्‍याचं तेल कोमट करुन त्यानं हलक्या हातानं केसांच्या मुळांशी मसाज करावा. बाळांतपणानंतर आहार खूप महत्त्वाचा आहे. लोहयुक्त आहार घेणं आवश्यक आहे. मेथी, राजगिरा, पालक या पालेभाज्या, खजूर, सफरचंद,गूळ, शेंगदाणे हे सर्व लोहयुक्त पदार्थ आहेत. त्यांचं सेवन वाढवलं पाहिजे.

* केसांसाठी झिंक सप्लिमेण्ट आवश्यक आहे. आहारात प्रथिनांचं प्रमाण पुरेसं हवं. अन्नातून मिळणारी प्रथिन, दूधातून , दुग्धजन्य पदार्थातून मिळणारी प्रथिनं महत्त्वाची असतात.

*  साखरेवर , गोड पदार्थांवर नियंत्रण गरजेचं असतं. कारण कबरेदकांमुळेही केसांचं नुकसान होतं.

*  जास्त खाणं हे जसं त्रासदायक असतं तसंच कमी खाणंही समस्या निर्माण करतं. अनेकजणींना बाळांतपणानंतर पटकन बारीक व्हायचं असतं म्हणून त्या खाणंच कमी करतात. पण त्यामुळे शरीरात आवश्यक अन्नघटकांची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम त्वचेपासून केसांपर्यंत जाणवतो.

* बाळांतपणानंतर शरीरात आरोग्यदायी फॅटस जाणं आवश्यक असतं. हे फॅटस दुधातून , सुक्या मेव्यातून मिळतात. केसांसाठी ओमेगा 3 हे फॅटी अँसिड अत्यंत आवश्यक असतं. हा घटक असलेले अन्नपदार्थ आहारात असायला हवेत. त्यासाठी जवस खायला हवेत.

* बाळांतपणानंतर शांत आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. झोप अपुरी किंवा विस्कळीत असली तर हार्मोन्समधे असंतुलन निर्माण होतं. त्याचा परिणाम केसांवर होतो . त्यामुळे केस चांगले होण्यासाठी शांत पुरेशी झोप आवश्यक आहे.

*  केसांच्या पोषणात ताणरहित जीवनशैलीची महत्त्वाची भूमिका असते. म्हणून बाळांतपणानंतर जीवनशैली तणावरहित असायला हवी. म्हणजे चित्त शांत असलं पाहिजे, आईपणाचा उपभोग आनंदानं घ्यायला हवा.

( डॉ. गीता वडनप स्त्रीरोग चिकित्सक आहेत.)