Join us  

पावसाळ्यात पोट सतत बिघडतं? ज्यूस-हर्बल टीसह हे काही लिक्विड उपाय नक्की करा. पचन सुधारेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 2:54 PM

उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला थंडावा देणारी पेयं असतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पोटाचं आरोग्य जपणारी खास पेयंही आहेत. ही पेयं घरच्याघरी बनवून आपण आपलं पोट सांभाळू शकतो. या पेयात फळांचे ज्यूस , हर्बल चहाचे आणि पाण्याचे प्रकार आहेत.

ठळक मुद्देसंत्र्याचं ज्यूसही पावसाळ्यात पचनास मदत करतं. कारण संत्र्यामधे विरघळणारे फायबर असतात. पावसाळ्यात पोटात चमका येतात त्या घालवण्याचं काम पुदिन्याचा चहा करतो. पावसाळ्यात पोट बर्‍याचदा अस्वस्थ असतं. त्यासाठी धन्याचं पाणी प्यावं. 

पावसाळा सुरु झाला की ओलसर दमट वातावरणामुळे शरीरास हानिकारक जिवाणूंचाही फैलाव होतो. पावसाळ्यात प्रामुख्याने पचनासंबंधीचे विकार डोकं वर काढतात. आणि नेमकं याच काळात पाऊस आहे म्हणून भजी-वडे असं पचनास जड पदार्थ खाण्याचा मोह होतो. यामुळे पचन व्यवस्था आणखीनच बिघडते. पावसाळ्यात पोटाचं आरोग्य जपणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराल थंडावा देणारी पेयं असतात त्याचप्रमाणे पावसाळ्यात पोटाचं आरोग्य जपणारी खास पेयंही आहेत. ही पेयं घरच्याघरी बनवून आपण आपलं पोट सांभाळू शकतो. या पेयात फळांचे ज्यूस , हर्बल चहाचे आणि पाण्याचे प्रकार आहेत.

पासाळ्यात चालणारे फळांचे ज्यूस

  •  पावसाळा सुरु झाल्या झाल्या कलिंगड बाजारात उपलब्ध असतात. तेव्हा काही दिवस कलिंगडाचं ज्यूस घेता येतं. कलिगंडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. कलिगंडच्या ज्यूसमुळे पचन चांगल होतं. पावसाळ्यात जाणवणारा बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही.
  • जांभूळ- जांभळं बाजारात फार कमी कालावधीसाठी येतात. त्याचा पोटाला फायदा करुन घेण्यासाठी जांभळ मिळतात तोपर्यंत जांभळाच्या ज्यूस वरचेवर घेणं पोटासाठी चांगलं ठरतं. जांभळात अ आणि क जीवनसत्त्व असतात. जांभळाच्या सेवनानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. जांभळाच्या रसानं पावसाळ्यात हमखास होणार्‍या उलटी- जुलाब, चिडचिडपणा या समस्यांपासून आपला बचाव होतो.
  •  लीचीचा ज्यूस पचनास चालना देतं, बध्दकोष्ठतेची समस्या दूर करतं. लिचीमधे फायबर आणि जीवनसत्त्वं भरपूर असल्यानं त्याचा फायदा शरीराला मिळतो.
  •  संत्र्याचं ज्यूसही पावसाळ्यात पचनास मदत करतं. कारण संत्र्यामधे विरघळणारे फायबर असतात. हे फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. शिवाय यामुळे वजनही घटण्यास मदत होते.

आरोग्यदायी हर्बल चहा

पावसाळ्यात ज्यूसपेक्षाही काहीतरी गरम प्यावंसं वाटतं . पावसाळ्यात चहा एरवीपेक्षा जास्त घेतला जातो. पण हा चहा पचनसंस्थेवर विपरित परिणाम घडवून शरीरातील अँसिडिटी वाढवतो. म्हणूनच पावसाळ्यात चहा घेताना विशेषत: हर्बल चहा घ्यायला हवा. हर्बल चहाचे अनेक प्रकार आहेत.

  • आल्याचा चहा- आल्याचा चहा पाचक विकर आणि गॅस्ट्रिक रस निर्मितीला प्रोत्साहित करण्यास मदत करतो. हे विकर आणि रस आहारातल्या घटकांचं विभाजन करुन पचन सुलभ करण्यास मदत करतात. या चहाने पचनासंबंधीच्या समस्या दूर होतात.
  • कॅमोमाइल चहा- कॅमोमाइल हे एक फुल आहे. या फुलाच्या चहात सूक्ष्मजीवरिरोधी आणि दाह कमी करणारे गुण असतात. या चहामुळे पावसाळ्यात होणारी पोटदुखी, अँसिडिटी, हायपर अँसिडिटी. डायरिया, छातीत जळजळ यासारख्या पचनाशी संबंधित विकारांना आराम मिळतो.
  • दालचिनी आणि आल्याचा चहा- हा हर्बल चहा पचनासाठी खूप उपयूक्त मानला जातो. आलं आणि दालचिनी पचनासंबंधी काही समस्या उद्भवल्यास त्या दूर करतात. दालचिनी पोटातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करतं. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं. आणि आल्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. दालचिनी आणि आल्याचा चहा एकत्र करुन पिल्यास पचनाला त्याचा चांगला फायदा होतो.
  • पुदिन्याचा चहा- पुदिन्याच्या रसात जीवाणूविरोधी गुण असतात. पचन संस्थेवर पडलेला ताण दूर करुन त्याला आराम देण्याचं , पोटदुखी कमी करण्याचं काम करतो. याशिवाय पोटाचे स्नायू संकुचित झाल्यास त्याला पुन्हा पूर्ववत करतो. पावसाळ्यात पोटात चमका येतात त्या घालवण्याचं काम पुदिन्याचा चहा करतो.

ताक -हळद- धन्याचं पाणी

  • ताक पावसाळ्यात निर्माण होणार्‍या हानिकारक जीवाणूंना रोखण्याचं काम करतं. तसेच पोटास जड पदार्थ पचवण्यासही मदता करतं. पावसाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. पण ताकामुळे शरीरात ओलावा टिकून राहातो. तसेच ताक शरीराच आवश्यक पोषणही घडवून आणतं.
  •  हळद ही दाहविरोधी असते. तसेच तिच्यात अँण्टिऑक्सिडेण्टसही असतात . हळदीतील कक्यरुमिन हा घटक पोट साफ होण्यास, पोट दुखी कमी करण्यास आणि जुलाब झाल्यास ते थांबवायला मदा करतं. म्हणुन पावसाळ्यात हळदीचं पाणी पिण्यास महत्त्व आहे.
  • पावसाळ्यात पोट बर्‍याचदा अस्वस्थ असतं. त्यासाठी धन्याचं पाणी प्यावं. रात्री पाण्यात धने भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी गाळून पिल्यास पोटातील अस्वस्थता, सूज, पोटदुखी यासारखे विकार सहज बरे होतात.