Join us  

Navratri Special- भोगर खिचडी -मिष्टी पुलाव पश्चिम बंगालमधील हे 2 पदार्थ लाजवाब, ट्राय रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 5:47 PM

पश्चिम बंगालमधे नवरात्रीत देवीला भोगर खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. तर मिष्टी पुलाव ही देखील बंगालचीच खासियत. ही खिचडी आणि पुलाव जो खाणार तो पुन्हा पुन्हा मागणार. कसे करतात हे पदार्थ

ठळक मुद्देभोगर खिचडी करायला जास्त वेळ लागत असला तरी चवीला मात्र अप्रतिम लागते. मिष्टी पुलाव ही पश्चिम बंगालमधील एक विशेष पाककृती आहे. हा पुलाव तिथे प्रत्यके सणावाराला केला जातो. भोगर खिचडी आणि मिष्टि पुलाव यासाठी बासमती तांदूळच वापरावा.  

 भारतात सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी तो साजरा करण्याची पध्दत मात्र वेगळी असते. नवरात्री उत्सवात पश्चिम बंगालमधील दुर्गा पुजा विशेष लक्ष वेधून घेते. नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून दसर्‍यापर्यंत पश्चिम बंगालमधे दुर्गा पुजा होते. दुर्गा पुजेदरम्यान वेगवेगळ्या पदार्थांचा भोग देवीला लावला जातो. देवीच्या नैवेद्याचे पदार्थ हा आकर्षणाचा मुद्दा असतो. या पाच दिवसात देवीला एकदा भोगर खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. ही भोगर खिचडी करायला जास्त वेळ लागत असला तरी चवीला मात्र अप्रतिम लागते. एरवी बंगाली घरांमधेही ही खिचडी नेहेमी केली जाते.ही खिचडी देवीला भोग म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवली जाते म्हणून तिला भोगर खिचडी असं म्हणतात.

Image: Google

भोगर खिचडी

ही खिचडी तयार करण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ, अर्धा कप पाणी तांदूळ धुण्यसाठी, 1 कप मुगाची डाळ, 6 चमचे तेल, दालचिनीचे 4-5 तुकडे, वेलचीचे 4 दाणे, 7 लवंगा, 1 चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा मोहरीचं तेल, 2 तमालपत्रं, 2 सुक्या लाल मिरच्या, 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं, 1 चिरलेला टमाटा, 1 बटाटा, थोडा फ्लॉवर, 1-2 हिरव्या मिरच्या एक ते दिड लिटर गरम पाणी, अर्धा कप हिरवे मटार, 2 चमचे साखर, 1 चमचा तूप एवढं जिन्नस घ्यावं.

भोगर खिचडी करताना आधी तांदळात अर्धा कप पाणी घालून तांदूळ धुवून घ्यावेत. नंतर तांदळातलं पाणी निथळून घ्यावं आणि दहा मिनिटं तांदूळ कोरडे होवू द्यावेत. एका कढईत 1 चमचा तेल घालून गरम करावं. त्यात तांदूळ घालून ते चांगले परतून घ्यावेत. एका दुसरी कढई गरम करुन त्यात मुगाची डाळ भाजून घ्यावी. 2-3 मिनिटं मुगाची डाळ कोरडी भाजून घ्यावी आणि मग एका भांड्यात काढून घ्यावी. भाजलेल्या डाळीत एक कप पाणी घालून ती चांगली धुवून घ्यावी. धुतल्यानंतर डाळ सुकण्यासाठी एका ताटात पसरुन ठेवावी.

Image: Google

पुन्ह कढई गरम करावी. त्यात बंगाली गरम मसाला करुन घ्यावा. त्यासाठी दालचिनी, वेलची आणि लवंगा घालून हे मसाले कोरडेच भाजून घ्यावेत. ते थोडे गार झाले की मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यावेत. नंतर एका वाटीत आल्याची पेस्ट, हळद, जिरे पूड व्यवस्थित एकत्र करुन घ्यावेत. कढईत मोहरीचं तेल घालून ते गरम करावं. तेल गरम झालं की त्यात तमाल पत्रं आणि आख्खी लाल मिरची, 2 लवंगा, दालचिनी, जिरे, 2 चमचे किसलेलं ओलं खोबर आणि आल्याची पेस्ट घालून सर्व जिन्नस चांगलं परतून घ्यावं. हे मसाले चांगले परतले गेले की त्यात एक चिरलेला टमाटा घालावा. कढईत एक चमचा तेल घालून ते गरम करावं. त्यात चिरलेले बटाटे घालून ते परतून घ्यावे. बटाटे परतले गेले की फ्लॉवरचे तुकडे घालावेत. ते परतून घ्यावेत. हिरवे मटारही परतून घ्यावेत. परतलेले बटाटे , फ्लॉवरचे तुकडे आणि मटार टिश्य़ु पेपरवर काढून घ्यावेत. त्याच कढईत भाजलेले तांदूळ आणि डाळ घालावी. त्यात चवीनुसार मीठ, मधे कापून घेतलेल्या मिरच्या घालाव्यात. यावर गरम केलेलं पाणी घालावं. कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटं आतलं मिश्रण शिजू द्यावं. पाच मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून त्यावर चिरुन घेतलेला टमाटा घालावा. वरुन आधी वाटून ठेवलेला बंगाला मसाला भुरभुरावा. वरुन पुन्हा अर्धा लिटर गरम पाणी घालावं आणि कढईवर पुन्हा झाकण ठेवून खिचडी पंधरा मिनिटं शिजवावी. पंधरा मिनिटांनी खिचडी शिजली की त्यावर वरुन एक चमचा साजूक तूप घालावं. गॅस बंद करुन वरुन कोथिंबीर भुरभुरावी.

खिचडी ही भारतातल्या प्रत्येक भागात होते. प्रत्येक भागातल्या खिचडीची पध्दत वेगळी, चव वेगळी. पण पश्चिम बंगालधील या भोगर खिचडीचा स्वाद मात्र एकदम स्पेशल वाटतो.

मिष्टी पुलाव

मिष्टी पुलाव ही पश्चिम बंगालमधील एक विशेष पाककृती आहे. हा पुलाव तिथे प्रत्यके सणावाराला केला जातो. बासमती तांदळापासून तयार केलेला मिष्टी पुलाव उत्तम लागते. पण ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी मात्र ब्राउन रंगाच्या तांदळाचा उपयोग करावा. ब्राऊन राइसच्या मिष्टी पुलावात कमी कॅलरीज असतात. यामुळे मिष्टी पुलाव खावून वजन वाढत नाही. आपल्याला आवडेल तो सुकामेवा या पुलावात घालता येतो. साजूक तुपाऐवजी या पुलावात डाएट बटर घातलं तरी चालतं.

Image: Google

मिष्टी पुलाव तयार करण्यासाठी 2 कप बासमती तांदूळ, दोन छोटे चमचे हळद, 3 मोठे चमचे साखर, 4 लवंगा, 4 वेलची, 1 तेजपत्ता, 2 मोठे चमचे काजू , किशमिश, 1 मोठा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घ्यावं.मिष्टी पुलाव करताना एका भांड्यात तांदूळ अर्धा तास भिजवावेत. नंतर सर्व पाणी निथळून घ्यावं आणि तांदूळ एका बाजूला ठेवून द्यावेत. मध्यम आचेवर कढई गरम करावी. त्यात तूप घालावं. तुपात लवंग, वेलची आणि तमालपत्रं घालावं. त्यानंतर त्यात तांदूळ, हळद, साखर, मीठ घालून तीन चार मिनिटं तांदूळ चांगले परतून घ्यावेत. तांदूळ भाजल्यावर त्यात काजू, किशमिश आणि उकळून पाणी घालावं. एकदा उकळी आली की गॅस मंद आचेवर करुन पुलाव चांगला शिजू द्यावा. नंतर गॅस बंद करावा.