Join us  

सनस्क्रीन, मॉश्चरायझर, झोप आणि पाणी .. उन्हाळ्यात सुंदर दिसण्यासाठी आणखी काय हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 5:21 PM

उन्हाळ्यात आपलं सौंदर्य जपण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपली त्वचा ही सुदृढ आणि निरोगी ठेवावी. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फार काही लागत नाही.

ठळक मुद्देहिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतु असला तरी त्वचेची काळजी घेणं हा नियम आहे.उन्हाळ्यात कोरडेपणा, काळसरपणा, लालसर चट्टे, रॅश, मुरुम, पुटकुळ्या, फोड या समस्या त्वचेला छळतात.प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण केल्यास उन्हामुळे होणारे अपाय होत नाहीत.त्वचेवरच्या मृत पेशी आपली त्वचा निस्तेज करतात.मॉश्चरायझर हे त्वचेचं मुख्य खाद्य आहे. आणि नियमित मॉश्चरायझर वापरणं ही निरोगी त्वचेतील गुंतवणूक आहे.

   हिवाळा हा त्वचेसाठी जास्त त्रासदायक असतो. म्हणून हिवाळ्यातच त्वचेची काळजी घ्यावी लागते. हा केवळ एक समज आहे. प्रत्येक ऋतुचं स्वत:चं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे प्रत्येक ऋतुचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होत असतो. तसंच त्वचेच्या बाबतीतही आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही ऋतु असला तरी त्वचेची काळजी घेणं हा नियम आहे.उन्हाळ्यात आपलं सौंदर्य जपण्याचा मुख्य मार्ग म्हणजे आपली त्वचा ही सुदृढ आणि निरोगी ठेवावी. उन्हाळ्यात कोरडेपणा, काळसरपणा, लालसर चट्टे, रॅश, मुरुम, पुटकुळ्या, फोड या समस्या त्वचेला छळतात. आपल्या त्वचेच्या बाबतीत हा छळ यंदाच्या उन्हाळ्यात होऊ द्यायचा नसेल तर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आताच पावलं उचलायला हवीत.उन्हाळ्याच्या दिवसात एकूणच हालचाली मंदावतात. आळस आल्यासारखा वाटतो. पण म्हणून या दिवसात त्वचेची काळजी घेण्यात आळस केला तर मात्र त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे आळस झटकून आपल्या त्वचेसाठी थोडी मेहनत घेतली तर त्याचे परिणाम आपल्याला आरशात स्वत:चा चेहेरा बघतांना होणार्‍या आनंदात दिसतात.त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात असं नाही. काही नियम पाळणं, काही गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या सवयीत केला तरी उन्हाळ्यात त्वचा निरोगी राहाते.

निरोगी त्वचेसाठीचे नियम

- सुरक्षित सनस्क्रीनप्रखर उन्हातले सूर्यकिरण त्वचेसाठी खूप घातक असतात. या सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लोशन/ क्रीमची गरज असते. हे सनस्क्रीन लोशन आणि क्रीम हे नॉन टॉक्सिक असावे तरच ते त्वचा निरोठी ठेवू शकतात. सनस्क्रीन घेताना त्यावरची एसपीएफ रेंज आवर्जून बघावी. 30 एसपीएफ असलेलं सनस्क्रीन केव्हाही चांगलं. अनेकदा खूप जास्त रेंजचे एसपीएफ निवडण्यावर अनेकींचा भर असतो. 50 ते 100 एसपीएफ असलेले सनस्क्रीन उत्तम असा अनेकींचा समज असतो. पण एवढ्या हाय रेंज असलेले एसपीएफ 30 एसपीएफच्या तुलनेत केवळ एक ते दोन टक्केच सूर्यकिरण त्वचेपासून रोखू शकतात. त्यामुळे नॉन टॉक्सिक आणि 30 एसपीएफ असलेलं सनस्कीन वापरावं. उन्हाळ्यात केवळ एकदाच चेहेर्‍याला सनस्क्रीन लावून भागत नाही. तर 90 मीनिटानंतर ते पुन्हा लावायला हवं. प्रखर सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण केल्यास उन्हामुळे होणारे अपाय होत नाहीत.

- डेड स्कीन हटाव मोहिमत्वचेवरच्या मृत पेशी आपली त्वचा निस्तेज करतात. त्वचा कोरडी आणि खडबडीत होते. म्हणूनच त्वचेवरची ही डेड स्कीन काढणं महत्त्वाचं. डेड स्कीन काढण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा  एक्सफॉलिएटिंग करणं महत्त्वाचं. यामुळे त्वचेवरच्या मृत पेशी निघून जातात. नवीन पेशी वेगाने निर्माण होण्यास चालना मिळते. या नवीन पेशींमुळे वय होण्याच्या खुणाही चेहेर्‍यावर दिसत नाही. त्वचा तरुण दिसते. पण त्यासाठी एक्सफॉलिएटर म्हणून तुम्ही काय वापरता हे ही महत्त्वाचं. सौम्य आणि ओटस सारख्या धान्यांचा समावेश असलेल्या नैसर्गिक एक्सफॉलिएटर वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

मॉश्चरायझर

उन्हाळ्यात त्वचा कोरडी वाटत नाही म्हणून अनेकजण मॉश्चरायझर वापरत नाही. पण मॉश्चरायझर हे त्वचेचं मुख्य खाद्य आहे. आणि नियमित मॉश्चरायझर वापरणं ही निरोगी त्वचेतील गुंतवणूक आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही नियमित मॉश्चरायझर वापरायला हवं. हे मॉश्चरायझर त्वचेतला ओलसरपणा टिकवून ठेवतो. प्रखर उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान हे मॉश्चरायझर नियमित वापरल्याने टाळू शकतो. 

पुरेशी झोप

उन्हाळ्यात लवकर झोप येत नाही. त्यामुळे टीव्ही पाहाणं, गप्पा मारणं, फिरायला जाणं, खेळणं अशा गोष्टी रात्री उशिरापर्यंत चालतात. पण त्यामुळे झोप पुरेशी होत नाही. झोप पुरेशी झाली नाही तर ताण वाढवणारे हार्मोन्स जास्त स्रवतात. त्यामुळे त्वचेत कोलॅजन निर्मितीचं प्रमाण घटतं. कोलॅजन घटण्याचे परिणाम त्वचेवर होतात. त्वचेतला लवचिकपणा कमी होतो. त्वचा ही ओढल्यासारखी आणि थकल्यासारखी वाटायला लागते. त्यामुळे उन्हाळ्यातल्या सुटीच्या दिवसातही झोपेच्या बाबत कंजुषी करु नये. ती पुरेशी होईल याची काळजी घ्यावी.

 

भरपूर पाणी पाणी हे शरीराचं कार्य सुरळीतपणे पार पाडायला मदत करतं. पाण्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. पाणी पुरेसं प्यायल्यानं त्वचेत ओलसरपणा राहातो. पाणी हे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. पाण्यामुळे आपल्या किडनीचं काम व्यवस्थित होतं. आणि पाणी जर कमी प्यायलं गेलं तर त्याचा परिणाम म्हणून किडनी पुरेशा क्षमतेनं काम करत नाही. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जात नाही. याचा परिणाम थेट त्वचेवर होतो. त्यामुळे पुरेसं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिणं हा नियम आहे.