Join us  

वाढत्या उन्हात रखरखीत निस्तेज त्वचेचं करायचं काय? काय केलं तर त्वचेत जरा जान येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 8:33 PM

प्रखर ऊन, आर्द्रता आणि वातावरणातील प्रदूषण यामुळे त्वचेसाठी उन्हाळा घातक ठरु शकतो. उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळायचे असतील तर सौंदर्य नियमांचं पालन करायलाच हवं.

ठळक मुद्देखास उन्हाळ्यासाठी असलेलं फेसवॉश निवडावं. या फेसवॉशनं चेहेऱ्यावर जमा होणारं अतिरिक्त तेल निघून जातं आणि त्वचा स्वच्छ होते.अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असतात. यासाठी अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट सीरम वापरावं. या सीरमच्या वापरानं चेहेरा हा ओलसर राहातो तसेच वातावरणातील घटकांमूळे त्वचेची होणारी हानीही भरुन निघते.ऊन आणि आर्द्रता यामूळे आपल्या त्वचेची घुसमट होत असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या काळात हेवी मेकअप करुन त्वचेला त्रास देणं हे चूकच. त्यापेक्षा हलका मेकअप करुन त्वचेला श्वास घेण्याचा अवकाश द्यायला हवा.

उन्हाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला खूप काही सोसावं लागतं. प्रखर ऊन, घामाच्या धारा, वातावरणातलं प्रदूषण यामुळे आपल्या त्वचेचं नैसर्गिक तेज निघून जातं. त्वचा तेलकट, खराब होते आणि त्याचा परिणाम म्हणून चेहेराही थकलेला आणि निस्तेज दिसतो. उन्हाळ्यात उन्हासोबतच वातावरणातील आर्द्रताही वाढते. यामुळे सेबाशिअस ग्रंथी जोमानं काम करतात. म्हणूनच तेलकट त्वचा अधिक तेलकट आणि कोरडी त्वचा खडबडीत होते. सूर्यकिरणांमुळे मेलानिन रंगद्रव्याची जास्त निर्मिती होते. मेलानिनची निर्मिती जास्त होणं म्हणजे त्वचा काळवंडणं. उष्णतेनं त्वचेची रंध्र उघडतात. आणि मग त्यात तेल, वातावरणातील धूळ, जीवाणू साठून ती बंद होतात. त्याचाच परिणाम म्हणजे चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या आणि फोड येतात आणि त्वचा खराब होते. म्हणूनच उन्हाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. सहज सोपे उपाय करुन ही काळजी घेणं शक्य आहे.

 

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी

- बाराही महिने एकाच प्रकारची सौंदर्य उत्पादनं वापरुन चालत नाही. वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार त्वचेवरही विशिष्ट परिणाम होत असतात. हे परिणाम डोळ्यासमोर ठेवून सौंदर्य उत्पादनं निवडावी लागतात. याच नियमानुसार खास उन्हाळ्यासाठी असलेलं फेसवॉश निवडावं. या फेसवॉशनं चेहेऱ्यावर जमा होणारं अतिरिक्त तेल निघून जातं आणि त्वचा स्वच्छ होते. जर त्वचा कोरडी असेल तर नॉन फोमिंग फेस वॉश वापरावं. दिवसातून अनेकवेळा चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच सोबत ताजीतवानीही होते.

- अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असतात. यासाठी अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट सीरम वापरावं. या सीरमच्या वापरानं चेहेरा हा ओलसर राहातो तसेच वातावरणातील घटकांमूळे त्वचेची होणारी हानीही भरुन निघते. यासोबतच आहारातही अ‍ॅण्टिऑक्सिडण्टचं भरपूर प्रमाण असलेली फळं, हिरव्या फळभाज्या, पालेभाज्या, ग्रीन टी, बदाम, अक्रोड, कडधान्यं यांच समावेश करावा.

- उन्हाळ्यात आपल्या शरीराला जशी ओलाव्याची गरज असते तशीच त्वचेलाही असते. आपली त्वचा ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी बाजारत हायड्रेटिंग मास्क मिळतात. त्याचा उपयोग करता येतो.

- त्वचा वरचेवर स्वच्छ करत राहाणे हा महत्त्वाचा सौंदर्य नियम आहे. त्वचा स्वच्छ करत राहिल्यानं त्वचा श्वास घेऊ शकते. घराच्याघरी त्वचा स्वच्छ करणाचा उपाय करता येतो. त्यासाठी कॉफीच्या बिया वाटून ही त्या खोबरेल तेलात मिसळाव्यात आणि त्यात समुद्री मीठ घालावं . हे मिश्रण हलक्या हातानं चेहेऱ्याला मसाज करत लावावं. त्वचा स्वच्छ करताना सौम्य घटकांचा वापर करावा. घटक तीव्र असले किंवा जोरजोरात घासून त्वचा स्वच्छ केल्यास त्वचेवर ओरखडे पडतात.

- चेहेऱ्याला सनस्क्रीन लावणं हे एरवीही गरजेचं असतं. उन्हाळ्यात तर याची गरज जास्त असते. दिवसातून दोन ते तीन वेळेस ३०-५० एसपीएफ असलेलं सनस्क्रीन वापरावं.

- ऊन आणि आर्द्रता यामुळे आपल्या त्वचेची घुसमट होत असते. म्हणूनच उन्हाळ्याच्या काळात हेवी मेकअप करुन त्वचेला त्रास देणं हे चूकच. त्यापेक्षा हलका मेकअप करुन त्वचेला श्वास घेण्याचा अवकाश द्यायला हवा. उन्हाळ्यात टिन्टेड मॉश्चरायझर, टिन्टेड लिपबाम आणि नैसर्गिक काजळ एवढ्या जुजबी साधनांनी मेकअप केल्यास आपल्या त्वचेला पुरेसा आराम मिळतो.

- उन्हाळ्यात त्वचेची रंध्र उघडी पडतात त्यात तेल साठू नये याची काळजी घेण्यासाठी टोनर वापरणं गरजेचं आहे. काकडी किंवा कोरफडयुक्त टोनर वापरल्यानं त्वचेस फायदा होतो.

- उन्हाळ्यात मॉश्चरायझरची काय गरज असंही अनेकांना वाटतं. पण उन्हाळ्यातही मॉश्चरायझरची गरज असते. पण जे मॉश्चरायझर आपण हिवाळ्यात वापरतो तेच उन्हाळ्यात वापरुन चालत नाही. हलकं, चिकट नसलेलं मॉश्चराझर वापरावं.शिया बटरयुक्त मॉश्चरायझर वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

- भरपूर पाणी पिणं ही बाब त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे . पाणी पुरेशा प्रमाणात पिल्यानं त्वचेच्या पेशी निरोगी राहतात. त्वचा मऊ, मुलायम आणि ओलसर ठेवण्यास पाणी मदत करतं. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक घाम आणि लघवीद्वारे बाहेर पडतात.

- केवळ चेहेऱ्याची काळजी घेऊन भागत नाही. तर पायाची काळजीही घ्यावी लागते. पायाची त्वचा स्वच्छ करणं, मॉश्चरायझर लावणं या दोन गोष्टी करणं गरजेच्या आहे. उन्हाळ्यात प्रामुख्यानं चप्पल वापरली जाते. त्यामुळे पायाचा बराचसा भाग उघडा राहातो. म्हणूनच पायाची काळजी घेणं हा ही महत्त्वाचा नियम आहे.

- डोळ्याभोवतीच्या त्वचेवर उन्हाळ्यातल्या वातावरणाचा वाईट परिणाम होतो. डोळ्याभोवतीची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे ह्यॅलूरोनिक अ‍ॅसिड, काकडी , मध यांचा समावेश असलेलं अंडरआय जेलनं डोळ्याभोवतीची त्वचा चांगली राहाते. हे घटक डोळ्याभोवतीची त्वचा ओलसर ठेवतात आणि सुरकुत्यांना मज्जाव करतात.