Join us  

मान्सून स्पेशल फेशियल करा घरच्या घरी, त्यासाठी हवे फक्त डाळी-फळं आणि भाज्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 12:26 PM

पावसाळा हा लाभदायक ऋतू असला तरी इतर अनेक कारणांमुळे पावसाचं पाणी दूषित होतं. आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. आणि म्हणूनच पावसाळा आहे म्हणून त्वचेच्या बाबतीत निर्धास्त होवून निष्काळजीपणा न दाखवता इतर ऋतुंप्रमाणेच पावसाळ्यातही त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. ही काळजी घेण्यासाठी स्वयंपाकघरातले जिन्नस आहेच की सोबतीला...

ठळक मुद्देआंघोळीसाठी साबणाऐवजी पपई, केळ आणि हिरव्या मुगाची डाळ यांच मिश्रण वापरावं.पावसाळ्यात त्वचेवर किंवा चेहर्‍यावर जे फोड येतात त्यासाठी तुळशीची पानं आणि काकडीचा रस एकत्र हा लेप दिवसातून दोन ते तीन वेळेस लावावा.दहा ते बारा ग्लास पाणी प्यावं. एखादा ग्लास बार्लीचं पाणी किंवा नारळ पाणी प्यायल्यास त्वचा छान तुकतुकीत होते.

-डॉ. निर्मला शेट्टी

उन्हाळा सरून पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच हुश्य होतं. उन्हाळ्याचे चार महिने आपली त्वचा अक्षरश: भाजून, रापून निघते. उन्हाच्या झळांनी वैतागलेल्यांना म्हणूनच पावसाळा हवाहवासा वाटतो.पावसाचं पाणी म्हणजे शुध्द पाणी. हे शुध्द पाणी नुसतं त्वचेलाच नाहीतर आरोग्याला फायदेशीर असतं. पण पावसाचं पाण्यापासूनही आरोग्याला धोका पोहोचतो. पावसाचं शुध्द पाणी जेव्हा वातावरणातील प्रदूषित घटकांच्या बरोबरीनं वाहतं तेव्हा ते आरोग्यावर विपरित परिणाम करतं. त्वचेच्या संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते.पावसाळ्यात महानगरपालिका सोडत असलेल्या पिण्याच्या पाण्यात पाणी निर्जंतुकीकरणासाठी एरवीपेक्षा जास्त क्लोरीन मिसळलं जातं. क्लोरिनचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच पावसाळ्यात अनेकांची त्वचा काळवंडते आणि डागाळतेही.

पावसाळा हा लाभदायक ऋतू असला तरी इतर अनेक कारणांमुळे पावसाचं पाणी दूषित होतं. आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर आणि त्वचेवर होतो. आणि म्हणूनच पावसाळा आहे म्हणून त्वचेच्या बाबतीत निर्धास्त होवून निष्काळजीपणा न दाखवता इतर ऋतुंप्रमाणेच पावसाळ्यातही त्वचेची काळजी घ्यायलाच हवी.

पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना..

ऋतुप्रमाणे त्वचेची काळजी घेण्याची पध्दतही बदलते. पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची हे समजून घेतल्यास पावसाळ्यातल्या कुंद वातावरणातही आपली त्वचा एकदम फ्रेश राहू शकते.

  • आंघोळीसाठी साबणाऐवजी पपई, केळ आणि हिरव्या मुगाची डाळ यांच मिश्रण वापरावं.
  • पावसाळ्यात आंघोळ करतांना एकदम गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावं. एकदम कडक पाण्यामुळे त्वचा कोरडी होते आणि काळवंडतेही.
  • पावसाळ्यात चेहरा धुतांना योग्य क्लीन्जर वापरणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. यासाठी हळदीच्या लेपाचा उपयोग नक्कीच होतो. साबण वापरल्यामुळे त्वचा स्वच्छ झाल्याचा फील येतो पण तो वरवरचा आणि तात्पुरता असतो. साबणाच्या अतिवापरामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल शोषलं जातं. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. आणि म्हणूनच चेहरा धुतांना साबणाऐवजी सफरचंद, पपई सारखी फळं आणि मध वापरू शकता. बटाटा हा तर उत्तम क्लीन्जर आहे. आंघोळ करतांना त्वचेवरची घाण निघून त्वचा स्वच्छ व्हावी यासाठी हिरव्या मुगाचं पीठ, दूध आणि बदामाची पावडर किंवा ओटसची पावडर घ्यावी. हे सर्व घटक एकत्र चांगले मिसळून त्याचा लेप बनवावा. आंघोळीआधी हा लेप शरीराला हलक्या हातानं मसाज करत चोळावा. आणि नंतर कोमट पाण्यानं आंघोळ करावी. याच लेपात एक चमचा कडूलिंबाच्या पाल्याची पेस्ट टाकल्यास घरच्याघरी एक उत्तम अँण्टिसेप्टिक लेप तयार होतो.
  • पावसाळ्यात त्वचेवर किंवा चेहर्‍यावर जे फोड येतात त्यासाठी तुळशीची पानं आणि काकडीचा रस एकत्र हा लेप दिवसातून दोन ते तीन वेळेस लावावा. फोड बरे होतात.

पावसाळ्यातले फेशिअल्स

  • पावसाळ्यातल्या ओल्या गार वातावरणात ऊबदार फेशिअल्स त्वचेला आराम आणि फायदा देतात. सुक्या मेव्याचं फेशिअल या काळात उत्तम असतं. फेशिअल्ससाठी वापरल्या जाणार्‍या घटकांमध्ये नैसर्गिक तेल घटक असतात. तसेच हे घटक जंतूसंसर्गापासून त्वचेचं रक्षण उत्तम प्रकारे करतात. फेशिअल बनवण्यासाठी कस्तुरी मंजल या प्रकारचं हळकुंड घेवून त्याची पावडर बनवावी. ती अर्धा चमचा घ्यावी. तीन ते चार चमचे हिरव्या मुगाचं पीठ घेवून त्यात ती हळद टाकावी. हिरवे मूग म्हणजे त्वचेसाठी नैसर्गिक डिटर्जंट आणि क्लीन्जर असतात. यात दही घालून हे मिश्रण नीट एकजीव करून त्याचा लेप चेहेर्‍याला हलका मसाज करत लावावा. या लेपात एन्झाइम्स आणि जीवनसत्त्वं असतात. आणि म्हणूनच सर्व प्रकारच्य त्वचेसाठी हे फेशिअल उत्तम ठरतं.
  • आंघोळीआधी हा लेप संपूर्ण शरीरासाठी वापरायचा असल्यास हिरव्या मुगाचं पीठ आणि हळद यात दही न टाकता दूध टाकावं.
  • मध हे सुध्दा उत्तम फेशिअल असतं. मधही जंतूनाशक असतं. शिवाय त्यात त्वचेला उपयुक्त असलेलं मॉश्चरायझर असतं.
  •  सफरचंदापासून फेशिअल बनवतांना आधी सफरचंद किसून घ्यावं. त्यात मध घालावं. चेहेर्‍याला हा लेप हलक्या हातानं लावावा. फेशिअलसाठी फळांचा उपयोग केल्यास त्वचेला फायदा होतो कारण फळांमध्ये नैसर्गिक क्लिन्जर आणि मॉश्चरायझर असतात.
  •  कोरफडीचा गरानं चेहेर्‍याचा मसाज केल्यास वयस्कर दिसणारी, सुरकुतलेली त्वचा ही छान दिसू लागते.

 

त्वचेच्या पोतासाठी काकडी,कलिंगड आणि संत्र्याचा रस

काळवंडलेल्या चेहेर्‍यासाठी कलिंगड आणि काकडी किंवा संत्र्याचा रस वापरावा. फळांच्या रसाचं आवडीप्रमाणे कॉम्बिनेशन्स बनवता येतात. जसे कलिंगड आणि संत्री किंवा काकडी आणि कलिंगड किंवा गाजर आणि काकडी असे कॉम्बिनेशनस करून फळांचा रस चेहेर्‍याला लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो.

दहा ते बार ग्लास पाणी

पावसाळ्यात जास्त तहान लागत नाही. म्हणजे शरीराला पाण्याची इतकी गरज नसते असा समज करून घेणं त्वचेच्या आरोग्यासाठी घातक असतं. पावसाळ्यातही पुरेसं पाणी प्यावं. दिवसभरात साधारणत: दहा ते बारा ग्लास पाणी प्यावं. एखादा ग्लास बार्लीचं पाणी किंवा नारळ पाणी प्यायल्यास त्वचा छान तुकतुकीत होते.

सौंदर्यासाठी खाण्याची पथ्यं

त्वचा उत्तम राखायची असेल तर आहारही उत्तम हवा. पावसाळ्यात नेहमी ताजं अन्न घ्यावं. शिळं आणि राखून ठेवलेलं अन्न खाऊ नये. पावसाळ्यात सॅलेड ऐवजी सूप घ्यावं. आहारात सेलरी, पार्सली, ब्रोकोली, बीन्स, मका खावा. शेवग्याच्या शेंगापेक्षाही शेवग्याची पानं खावीत. शेवग्याची पानं उत्तम चवीची असून त्यात भरपूर जीवनसत्त्वं असतात. हातसडीच्या तादूंळ शिजतांना त्या भाताचं वरचं पाणी प्यावं. पावसाळ्यात आहाराची एवढी पथ्यं जरी पाळली तरी त्वचा छान राहते.nfo@nirmalherbal.com