Join us  

आपल्यासाठी उत्तम मास्क कोणता हे कसं ओळखायचं? डबल मास्क लावायचा तर कसा लावायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:52 PM

कोरोनापासून बचावाचा उत्तम मार्ग म्हणजे मास्क.  एकाचवेळी नाक आणि तोंड झाकलं जातं आणि याची सुरक्षितता पुष्कळ आहे पण मास्क घालण्याचे नियमच जर पाळले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नाही.

ठळक मुद्देमुळात मास्क नुसता वापरणं नाही तर तो योग्य पद्धतीने वापरणं हे त्याच्या योग्य फायद्यासाठी गरजेचं आहे!

राजश्री कुलकर्णी (एम.डी. आयुर्वेद)

अनेक वर्षांपूर्वी प्लेग, कॉलरा अशा साथी जगभरात आल्या होत्या. एकदम खूप लोकं बाधित झाल्यामुळे यांना एपीडिमिक असं संबोधलं गेलं पण कोरोनान हेही सगळे विक्रम मोडीत काढत जगावर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं की याला पॅनडेमिक असं म्हटलं गेलं. २०२० आणि २०२१ मध्ये आजार जरी तोच असला तरी त्याची लक्षणं बदलली आहेत. नवीन व्हेरियंट असा आहे की एकावेळी कुटुंबाच्या कुटुंबं पॉझिटिव्ह येत आहेत ,त्यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे. नवीन विषाणू हवेतून पसरतो की काय याबद्दल संशोधन सुरु आहे पण बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे शिंक ,खोकला या क्रियांद्वारे बाधित व्यक्तीच्या थुंकीमधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म तुषारांमधून हा पसरत जातो. इतरांना बाधित करतो. वेगवेगळ्या सरफेसेस वर वेगवेगळ्या कालावधीपर्यंत हे विषाणू ऍक्टिव्ह राहतो.  याच गोष्टीसाठी गर्दीत जाणं, जास्त लोकांशी संपर्क येणं हे अजिबात व्हायला नको कारण शिंक,खोकला या वेगांवर कोणाचाच कंट्रोल नसतो आणि पुष्कळ व्यक्ती या विषाणूंच्या कॅरिअर असू शकतात परंतु त्या स्वतः बाधित आहेत किंवा इतरांना मोठ्या संख्येने बाधित करु शकतात हे त्यांनाच माहीत नसते कारण त्यांना काहीही लक्षणं नसतात ज्याला हल्ली आपण असिम्पटोमॅटिक शब्दानं चांगलंच ओळखतो !मग यासाऱ्यापासून बचावाचा उत्तम मार्ग म्हणजे मास्क. विषाणू नाकातोंडाद्वारे शरीरात प्रवेशित होऊ नयेत म्हणून सर्वांत उपयुक्त आणि वापरायला सोपं असं साधन म्हणजे मास्क ! एकाचवेळी नाक आणि तोंड झाकलं जातं आणि याची सुरक्षितता पुष्कळ आहे पण मास्क घालण्याचे नियमच जर पाळले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नाही. बऱ्याच लोकांचं नाक बहुतेक वेळा उघडंच असतं, श्वास घ्यायला त्रास होतो असं यांचं म्हणणं असतं. काही तर त्याही पुढचे विद्वान असतात ,त्यांचं नाक आणि तोंड दोन्ही उघडं असतं आणि मास्क हनुवटीवर विराजमान झालेला असतो.  काहीजण तर त्याहीपेक्षा हुशार असतात ते मास्क वापरतच नाहीत. बऱ्याच बायका रुमाल, पदर, ओढणी, स्कार्फ ,स्टोल यापैकी कशाचाही वापर मास्क म्हणून करताना दिसतात पण त्यामुळे 100 टक्के प्रोटेक्शन मिळतंच असं नाही. आपल्यापैकी 90 % लोकांना हेही माहीत नाही की समजा एखादी कोरोना बाधित व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी शिंकली तर त्याचे जे ड्रॉप्लेट्स हवेत विखुरले जातात ते किती जणांना आणि किती अंतरापर्यंत बाधित करू शकतात ! त्या व्यक्तीच्या पेरिफेरी म्हणजे आसपास जवळपास आठ फूट अंतरापर्यंत अनेक व्यक्ती एकाच वेळी यामुळे इन्फेक्ट होऊ शकतात इतकं हे भयानक आहे. लक्षणं नसणारे पण कॅरिअर्स आणि बेपर्वा वागणारे, दुसऱ्यांची पर्वा न करता,मुख्य म्हणजे मास्क न लावणारे, इकडे तिकडे फिरणारे हे असेच लोकं गर्दीच्या ठिकाणी हजारो लोकांना कोरोनाचा प्रसाद वाटत फिरत असतात. त्यांनी जरी मास्क लावला असेल तरी हा धोका पुष्कळ अंशी कमी होतो.आता चर्चा आहे ती डबल मास्क, अर्थात दोन मास्क लावायची.

आपल्यासाठी कोणता मास्क उत्तम हे कसं ठरवायचं? डबल मास्क लावायचा तर कसा लावायचा?

१. सध्या प्रॉपर मास्क मध्ये तीन चार प्रमुख प्रकार आढळतात. एक साधा कापडी मास्क ! कॉटनच्या कपड्यापासून शिवलेले हे मास्क. दुसरे सर्जिकल मास्क म्हणजे डॉक्टर्स विविध शस्त्रक्रिया करताना वापरतात तसे मास्क, हे विशिष्ट प्रकारच्या सिंथेटिक कापडापासून बनवले जातात व खरं तर हे सिंगल यूज म्हणजे एकदा वापरून डिसपोझ ऑफ करुन टाकणं अपेक्षित असतं पण आपल्याकडे अशा वस्तू लगेच फेकून देणं आपल्या रक्तातच नाही त्यामुळे अनेक जण तेही पातळ मास्क धुवून धुवून वापरतात. हे मास्क खरंतर 60 टक्के प्रोटेक्शन देतात पण एकदाच वापरायला हवेत व फार गर्दीत जाता कामा नये.कॉटन मास्क वापरायला हरकत नाही पण त्याची एफिकसी बरीच कमी आहे म्हणजे ते 35% प्रोटेक्शन देऊशकतात. पण हेच कॉटन मास्क जर दोन किंवा तीन थर वापरून शिवले तर चांगला उपयोग होतो. कोरोना जसा अधिकाधिक पसरु लागला तसं घरीच जुने टी शर्टस वगैरे वापरून मास्क कसे बनवावेत याचे बरेच व्हिडीओज व्हाट्सएप, यू ट्यूब वगैरे वर येऊ लागले ,कॉटन किंवा होजिअरी मटेरियल वापरून बनवलेले हे टी शर्ट्स वापरायला हरकत नाही कारण ते खूपच कम्फर्टेबल असतात फक्त ते सिंगल लेयर न शिवता किमान तीन लेयर्सचे शिवावेत.हे मास्क 50 ते 85 टक्के संरक्षण देऊ शकतात.परदेशात काही ठिकाणी मध्यंतरी कॉटनचेच मास्क पण त्याला आतून एक कप्पा किंवा पॉकेट ,खिश्या प्रमाणेरचना करुन शिवले जात होते, त्या कप्प्यात रोज सकाळी एक कागदी हँड टिश्यू फोल्ड करुन टाकायचा म्हणजेहवा अधिक चांगल्या प्रकारे गाळून नाकात प्रवेशित होते पण हे आपल्याकडे फार बघायला मिळालं नाही कारणआपल्याकडे एकूणच कागदी टिश्यूज किंवा हँड टॉवेल्स चा वापर नगण्य आहे.नाकावर स्टीलची पट्टी असलेले कोन शेपचे मास्क मात्र भरपूर मिळतात पण ते फार सुरक्षित नाहीत.सगळ्यांत सुरक्षित मास्क म्हणजे N95 या प्रकारचा मास्क ! यातील डबल लेयर्स मुळे हवा गाळून आत प्रवेशितहोते पण त्यासाठी तो मास्क नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं जाईल असा घालणं आवश्यक आहे. हा मास्कवापरात असेल तर एकावर एक दोन मास्क घालण्याची गरज नाही.यातील N हे अक्षर असं सूचित करतं की NoOil म्हणजे ,आसपासच्या हवेत जर तैलीय किंवा ऑईल बेस्ड पार्टीकल्स नसतील तर हा मास्क तुमचं नाकातप्रवेशित होऊ शकणाऱ्या हवेतील जंतूंपासून 95 टक्के संरक्षण देऊ शकतात, पुढचा 95 हा आकडा हेच निर्देशित करतो. पण तेलाचा संपर्क येऊ शकतो अशा फॅक्टरीज ,ऑईल रिफायनरी, पेट्रोल पंप वगैरे ठिकाणी त्यांचा उपयोग नाही, तिथे R 95 किंवा P 95 असे Resistant to oil किंवा Oil proof असे वेगळ्या प्रकारचे मास्क वापरणं अपेक्षित आहे.

२. जे लोकं गर्दीच्या ठिकाणी काम करतात म्हणजे बँका, विविध ऑफिसेस, कंपन्या इ. त्यांनी अधिकसुरक्षिततेसाठी दोन मास्क एकावर एक वापरायला हरकत नाही. पण N95 मास्क वापरत असाल तर दोन मास्कनकोत, दोन सर्जिकल, दोन कॉटन असेही वापरून उपयोग नाही. बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे आतून सर्जिकलमास्क व त्यावरून कॉटन मास्क लावणे !३. मुळात मास्क नुसता वापरणं नाही तर तो योग्य पद्धतीने वापरणं हे त्याच्या योग्य फायद्यासाठी गरजेचं आहे!त्याचवेळी हा विषाणू साबण,अल्कोहोल असणारे सॅनिटायझर्स यामुळे नाहींसाही करता येतो त्यामुळे घराबाहेरपडलो ,कोणत्याही वस्तूशी ,पैसे,गाडी,पिशव्या ,सामान कशालाही हात लावला की लगेच हातावर सॅनिटायझरलावून हात चोळायचे म्हणजे लगेच हा संपर्क कमी होतो.नुसत्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यापेक्षा पाणी आणि साबण ,हँडवॉश वापरुन वाहत्या पाण्याखाली हातधुतले तर ते अधिक परिणामकारक ठरते म्हणून वारंवार हात धुवावेत.नाक आणि तोंड यातून विषाणूचा प्रवेशहोऊन ते जलद फुफ्फुसाकडे मार्गक्रमण करतात म्हणून नेहमीच व विशेषतः घराबाहेर असताना उगीचच चेहरा, नाक,तोंड यांना हात लावणं, स्पर्श करणं टाळायला हवं.

४. आठ दहा तास घराबाहेर काम करणारे किंवा गर्दीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी घरी आल्यानंतर कपडे लगेच गरम पाणी व डिटर्जंट यात भिजवणं, इतर वस्तू सॅनिटाईझ करुन घेणं आणि स्वतः साबण लावून गरम पाण्याने अंघोळ करणं यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका पुष्कळ कमी होतो .तेव्हा हे सगळं समजून घेऊन त्यानुसार वागूया म्हणजे हा आजार लवकर कमी व्हायला मदत होईल ,नाही का?

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या संचालक आहेत.)www.ayushree.com 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या