Sachin Vaze: हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाढलं टेन्शन; सचिन वाझेंनी तात्काळ...; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:32 AM2021-03-27T11:32:45+5:302021-03-27T11:40:21+5:30

मनसुख हिरेन यांची हत्या (Mansukh Hiren Suicide Case) झाली, त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani)) घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करण्याचा कट रचल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत आहेत. त्यांच्या कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे.

मुकेश अंबानींच्या घराखाली २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली. यानंतर याच कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Suicide Case) यांचा मृतदेह ५ मार्चला आढळून आला. हिरेन यांची हत्या वाझेंनीच केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकानं दिली आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह भरतीमुळे परत किनाऱ्याला परत येणार नाही, या भ्रमात सचिन वाझे होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाझेंचं टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे वाझेंनी तात्काळ आपल्याकडील पाचही मोबाईल नष्ट केले होते, अशी धक्कादायक माहिती वाझेंनी एनआयएला (NIA) दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मनसुख हिरेन आणि अँटालिया प्रकरणातील कारस्थान उघड करण्यासाठी एनआयएने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे त्यांनी वाझेंच्या सर्व मोबाईलमधील डाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही घटनांमध्ये वाझेंचे फोन हा महत्त्वाचा पुरावा असून त्याचा डेटा येताच वाझेंची सर्व पोलखोल उघड होण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. गायमुख येथे बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेला. यात, वाटेत कोणी अडवू नये म्हणून ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षकही वाहनात उपस्थित होते. या अधिकाऱ्यालाही यात अटक होण्याची शक्यता आहे.

काम झाल्यावर वाझे रात्री साडेदहाच्या सुमारास ते ठाण्याहून फ्री वेवरून मुंबईत पोहोचले. फ्री वे उतरल्यावर सर्वांत जवळचे पोलीस ठाणे हे डोंगरी असल्याने त्यांनी बारवर कारवाई दाखविण्यासाठी हे पोलीस ठाणे निवडले होते. येथील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

३ मार्च रोजी एक डान्स बार मालक आपल्या मर्सिडीजमधून पोलीस आयुक्त कार्यालयात आला होता. जवळपास चार ते पाच तास तो सीआययूच्या कार्यालयात उपस्थित होता. तेव्हा वाझे, विनायक शिंदेसह गुन्हे शाखेतील एक प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही तेथे हजर होता. त्यामुळे ही मंडळी येथे काय करत होती, तो डान्स बारमालक तेथे का आला? यासाठी त्यालाही चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती समजते आहे.

४ मार्चच्या रात्री मनसुख हे तावडे नावाच्या अधिकाऱ्याला भेटायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्या व्यक्तीसोबत मनसुख यांचे ११ मिनिटे संभाषण झाल्याचे समोर आले. तो व्यक्ती मनसुख यांच्या ओळखीचा असल्याशिवाय ते त्याच्याशी एवढा वेळ बोलणे शक्य नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.