मराठी साहित्याला वास्तवाचे वळण देणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 12:36 IST2017-09-25T12:24:54+5:302017-09-25T12:36:49+5:30

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं वयाच्या 76 व्या वर्षी सायन रुग्णालयात निधन झालं. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला होता.
1972 मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुंबई दिनांक' आणि 1977 मध्ये लिहिलेली 'सिंहासन' या दोन कादंबऱ्यांनी मराठी समाज मनावर विशेष प्रभाव टाकला. साधू यांनी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली
अरुण साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एकपरखड,व्यासंगी साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला.
८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुमारे ३० वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर साधू यांनी कुठच्याही वृत्तपत्रात नोकरी न करता मुक्त लेखन आणि मुक्त पत्रकारितेलाच वाहून घेतले.