तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 05:41 IST2025-06-26T05:40:20+5:302025-06-26T05:41:30+5:30

देशाच्या आर्थिक विकासवाढीत जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगाचे मोठे योगदान आहे. मर्कंटाईल एक्सपोर्टमध्ये या क्षेत्राचे ८ ते १० टक्के योगदान आहे.

Youth should carry forward tradition with honesty, innovation: Minister Aditi Tatkare | तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

मुंबई : प्रत्येक पिढीला नवे विचार असतात. प्रत्येक युग नाविन्यता घेऊन येते, पण परंपरेचा मान राखत पुढे जाणेही तितकेच गरजेचे आहे. तरुणांनी प्रामाणिकपणा आणि नवकल्पनांसह आपली परंपरा पुढे न्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी येथे केले.

जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या ‘इन्नोव्ह नेक्स्ट ४० अंडर ४०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ मंत्री तटकरे यांच्या हस्ते वरळीतील फोर सीझन हॉटेलमध्ये बुधवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचा वर्ल्ड गोल्ड कौन्सिल भागीदार आहे. यावेळी ‘जीजेईपीसी’चे अध्यक्ष किरीट भन्साळी, राष्ट्रीय प्रदर्शनाचे संयोजक नीरव भन्साळी, पश्चिम विभागाच्या अध्यक्ष खुशबू रानावत, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन, आदी उपस्थित होते.

देशाच्या आर्थिक विकासवाढीत जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगाचे मोठे योगदान आहे. मर्कंटाईल एक्सपोर्टमध्ये या क्षेत्राचे ८ ते १० टक्के योगदान आहे. जगातील सर्वांत मोठा डायमंड कटिंग हब आपल्याकडे आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उद्योग क्षेत्रासाठीच्या परवानग्या सिंगल विंडो करण्यासाठी, तसेच इज ऑफ डुईंग बिझनेसला राज्य सरकारचे प्राधान्य आहे, असेही तटकरे म्हणाल्या. 

तरुणांची कल्पकता महत्त्वाची 

आपण बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात आहोत. जगभरातील धोरणांमध्येही बदल होत आहे. आज शाश्वतता, पारदर्शकता आणि नैतिक व्यवहार याशिवाय पर्याय नाही. भारत आघाडीवर राहण्यामध्ये तरुणांची ऊर्जा आणि कल्पकता महत्त्वाची आहे, असे किरीट भन्साळी म्हणाले. 

आजचे तरुण मळलेल्या वाटेवर चालणारे नाहीत, तर नव्या मार्गांचे शिल्पकार आहेत. पुढचे दशक प्रश्न विचारणाऱ्यांचे, बदल घडवणारे आणि नवनव्या कल्पना मांडणाऱ्यांचे असेल, असे नीरव भन्साळी यांनी सांगितले. 

विविध क्षेत्रांतील उद्योजकांचा सहभाग 

या परिषदेत विविध क्षेत्रांतील तरुण, विचारवंत आणि नव्या काळानुरूप बदल घडविणारे उद्योजक एकत्र आले होते. त्यांनी आयपीओ आणि संपत्ती निर्मितीचा प्रवास, दागिन्यांच्या क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान, दागिन्यांच्या वाढत्या किमती, लॅबमध्ये डायमंड ब्रँड तयार करणे आणि व्यवसायवृद्धी आदी विषयांवर चर्चा केली.

Web Title: Youth should carry forward tradition with honesty, innovation: Minister Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.