शहरांमधील कचऱ्याचा प्रश्न संपणार? राज्य पातळीवर विशेष सेल करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:53 IST2025-07-15T09:52:52+5:302025-07-15T09:53:15+5:30
सोलापूरमधील कचरा समस्येबद्दल भाजपचे विजय देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. सोलापुरात कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी कचरा डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेणार का, असा प्रश्न केला.

शहरांमधील कचऱ्याचा प्रश्न संपणार? राज्य पातळीवर विशेष सेल करणार काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका, नगरपालिकांमधील कचरा व्यवस्थापनाच्या कामात एकसूत्रता आणण्यासाठी एक सेल तयार केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
सोलापूरमधील कचरा समस्येबद्दल भाजपचे विजय देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. सोलापुरात कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी कचरा डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेणार का, असा प्रश्न केला. ही बाब तपासून पाहिली जाईल, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. भाजपचे अभिमन्यू पवार यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यावर, हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवर एक सेल तयार करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जालन्यातील ‘ते’ निर्णय तपासण्याचे आदेश
जालना महापालिकेत आयत्यावेळी विषय आणून अनेक निर्णय घेण्यात आले होते. त्याचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र ते अद्याप झालेले नाही, याकडे अर्जुन खोतकर यांनी लक्ष वेधले.
त्यावर, याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे पडताळून पाहण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.