Join us  

महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार? मनसे बैठकीत नेमके काय झाले? वाचा, Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 3:07 PM

MNS Mahayuti News: महायुतीची जागावाटपावरून चर्चा सुरू असून, त्यावर शिक्कामोर्तब न झाल्यास मनसे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

MNS Mahayuti News: २८ मार्च रोजी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, यावेळी महायुतीचे नेमके जागावाटप, कुणाला किती जागा मिळणार हे जाहीर केले जाणार आहे. जागावाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यानंतर मनसेचा महायुतीतील सहभाग निश्चित झाल्यास या पत्रकार परिषदेला राज ठाकरे उपस्थिती लावू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झाली.

महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा होताना, मनसेने महायुतीकडे ३ जागांची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू होती. आता मात्र दोन जागांवर चर्चा सुरू आहे. या जागांवर पक्षप्रमुख राज ठाकरे काय तो निर्णय घेतील. त्या जागा पक्षप्रमुख राज ठाकरे यांना माहिती आहेत. त्यांनी काही जागा ठरवलेल्या असतील. त्यांना काही खात्री असेल, अशा जागा त्यांनी मागितल्या, अशी माहिती मनसे नेत्यांकडून देण्यात आली. बैठकीनंतर मीडियाशी बोलताना काही गोष्टींबाबत स्पष्ट भाष्य करण्यात आले. तसेच ०९ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार?

महायुतीसोबत सुरू असलेली जागावाटपाविषयीची चर्चा बिनसली किंवा महायुतीसोबत जायचा निर्णय अंतिम झाला नाही, तर मनसे यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार का, असा प्रश्न मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला. आम्ही यापूर्वीही लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. मी स्वतःदेखील लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यावर पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

दरम्यान, काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना शिंद गटाचे विलिनीकरण होऊन राज ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होऊ शकतात, अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावरून काही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बाळा नांदगावकर म्हणाले की, या केवळ चर्चा आहेत. याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. जर असे घडणार असेल, तर त्या त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल. अशा गोष्टी आमच्यापर्यंत येतील, तेव्हा जाहीरपणे सांगितल्या जातील, याची आपण खात्री बाळगा, असे बाळा नांदगावकर म्हणाले. 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मनसेराज ठाकरेमहायुती