Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; १२ डिसेंबरला 'पुढच्या प्रवासा'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:18 IST

मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्यापंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या भाऊ-बहिणींमध्ये निवडणुकीचा सामना रंगला होता. यामध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी पटकावत पंकजा मुंडे यांचा पराभव केला. 

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की, निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पाहत होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच 'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले. पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,""ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या " किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे असं त्यांनी पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जबाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे असं सांगितले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार की सक्रीय राजकारणातून बाजूला होणार याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपागोपीनाथ मुंडे