अभिजात मराठीला ज्ञानभाषा करून पुढील पिढीपर्यंत नेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:27 IST2026-02-28T09:25:47+5:302026-02-28T09:27:02+5:30
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवारी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात 'जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अभिजात मराठीला ज्ञानभाषा करून पुढील पिढीपर्यंत नेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
मुंबई : जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करू, असा निर्धार व्यक्त करत समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवारी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात 'जावे विनोदाच्या गावा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्यामुळे मराठीचा अभिमान हा सर्वप्रथम शिवरायांपासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे हे पाहायला मिळते. मराठीला पंतप्रधान मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय दिला असून मराठी साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
डिजिटल माध्यमांवर मराठीचा अधिकाधिक उपयोग करा
तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा वापर करत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.
संकटातही जो विनोद शोधतो तो खरा मराठी
मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे. विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला.
तंत्रज्ञान, संशोधन मराठी भाषेतून झाले पाहिजे
मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल आणि पुढे न्यायचे असेल तर तंत्रज्ञान, संशोधने ही मराठी भाषेतूनच झाली पाहिजेत. तेव्हा मराठी ही ज्ञानभाषा होईल, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.