Join us  

CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्...

By मुकेश चव्हाण | Published: January 07, 2021 8:37 AM

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे.

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरणावरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना मंत्रीमंडळ निर्णयाच्या माहितीमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादच्या उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असं केल्याने मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं आवाहन देखील बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यासाठी 24 कोटी 64 लाख 24 हजार 788 इतका खर्च येणार आहे. या संदर्भातील ट्वीट CMO च्या हँडलवर करण्यात आलं आहे. त्यात संभाजीनगर असा उल्लेख केला आहे.

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. त्यासाठी महापालिकेत आत्तापर्यंत झालेले ठराव, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे या संदर्भातला सविस्तर अहवाल राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे.

औरंगजेब हा तुमचा आदर्श आहे का?- खासदार अरविंद सावंत

 शिवसेना औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यावर ठाम आहे. औरंगजेब हा तुमचा आदर्श आहे का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली होती. 

टॅग्स :उद्धव ठाकरेबाळासाहेब थोरातमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारऔरंगाबादकाँग्रेस