मुंबई : राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार. या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल, या भूमिकेबरोबर ज्यांना वाटचाल करायची असेल त्यांचे पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा मुद्दाच नसल्यामुळे त्याबद्दल भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा विचारही समोर आला नाही. त्यामुळे त्याची चर्चा, त्याला विरोध, अनुकूलता असे प्रश्नच उरत नाहीत. आमच्या मूळ विचारधारेसोबतच एनडीएमध्ये सहभागी असल्यामुळे पुढील राजकीय प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यात बदल होण्याचे कारण नाही.
२०१४ पासून अनेकवेळा भाजपसोबत सत्तेमध्ये जाण्याबाबत आमची चर्चा झाली होती. काही वेळा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचलो होतो. परंतु, त्यावेळी अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आम्ही आता घेतलेली भूमिका आणि विलीनीकरण हे दोन ध्रुवावरील विषय आहेत. माझा, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध हा मुद्दा त्यात नाही. सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या सर्वांचा कलेक्टिव्ह होता. सर्वांनी मिळून तो घेतला. त्याला आमदारांची, जनतेचीही साथ मिळाली, असे तटकरे म्हणाले.
जनतेने विधानसभेत भरभरून जागा दिल्या
लोकसभेनंतर आम्ही कुणाच्या खिजगणतीत नव्हतो. विधानसभेला फक्त पाच-सहा जागा मिळतील असे बोलले जात होते. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी मेहनत घेतली. पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवली. मनात विश्वास निर्माण झाल्यामुळेच जनतेने राष्ट्रवादीला भरभरून जागा दिल्या, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.