जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:50 IST2025-06-30T12:44:37+5:302025-06-30T12:50:30+5:30
त्रिभाषा सुत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeay: पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यावर राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर रविवारी हा निर्णय जाहीर केला. ठाकरे बंधूंच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हिंदीच्या मु्द्द्यावरुन माघार घेतली. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेला ५ जुलैचा मोर्चा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी विजयी मेळावा घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांनी त्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नसेल असं स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरुन सरकारने माघार घेतल्यानंतर सरकारने पावसाळी अधिवेशनाआधी त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द केला. त्रिभाषेच्या संदर्भात धोरण ठरवण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आली असून त्याच्या अहवालावर कितवी पासून हिंदी शिकवण्यात यावी याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, त्रिभाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्याने मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा ५ जुलै रोजी निघणारा मोर्चा रद्द करुन त्याऐवजी विजयी मेळावा होणार आहे. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
"या निर्णयानंतर काल मला संजय राऊतांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं यापुढे काय करायचं. मी म्हटलं मोर्चा रद्द करावा लागेल. ते म्हणाले की आपण एक विजयी मेळावा घ्यायला पाहिजे. मी घेऊया असं म्हटलं. माझ्या लोकांसोबत चर्चा केल्या नंतर आपण ठरवूया. पाच तारखेला काय करायचं अजून काही ठिकाण ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलेन. माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील. त्यातून पाच तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला पक्षीय लेबलं लावण्यात काही अर्थ नाही. हा विजय खरातर मराठी माणसाचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.
"मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल माझा त्याला विरोध असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याला माझी विनंती हीच राहील की मराठी महाराष्ट्र या विषयावर कुठल्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व बाजूंनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहे. हे थांबवणे आवश्यक आहे. मराठी माणसाने देखील आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे," असंही राज ठाकरे म्हणाले.