केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्याची जोरदार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:54 IST2025-05-14T19:54:47+5:302025-05-14T19:54:58+5:30
Ramdas Athawale : धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्याची जोरदार मागणी
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल रात्री धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीतील नागरिकांसाठी चांगल्या आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रकल्पाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले.
"धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर इथे मराठी, हिंदी, तमिळ भाषिक आणि विविध धर्मीय लोक राहतात. सर्वांनाच सन्मानपूर्वक आणि सुरक्षित घरे मिळायला हवीत," असे आठवले म्हणाले. "हा पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा, जेणेकरून येथील नागरिकांचे पुनर्वसन लवकरात लवकर होईल."
"पुनर्विकास प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत मतभेदाचा अधिकार असतो, पण हे काम लोकांच्या हिताचे आहे. "लोकशाहीत विरोध करणे योग्यच आहे. पण धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे आणि तो लवकरात लवकर सुरू व्हावा, असे आमचे मत आहे" असे आठवले यांनी स्पष्ट केले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सध्या राज्य व केंद्र सरकारचे लक्ष असून, या प्रकल्पामुळे लाखो नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. मंत्री आठवले यांच्या या वक्तव्यामुळे प्रकल्पाला मिळणारा पाठिंबा अधिक ठळकपणे पुढे आला आहे.