Join us  

मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 8:13 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. ''कश्मीरातील अतिरेक्यांचे थैमान पाहता या देशाला खरेच संरक्षणमंत्री आहे काय? असा प्रश्न पडला आहे. अत्यंत कमजोर व कुचकामी, बिनचेहऱ्याची व्यक्ती संरक्षणमंत्री पदावर बसवून आपण देशाचे नुकसान करीत आहोत'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, ''औरंगजेबासारखे अनेक मुसलमान जवान देशासाठी कश्मीरच्या रणभूमीवर शहीद होत आहेत व देशाने त्यांच्याविषयी सदैव अभिमान बाळगायला हवा. देशातील मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबाच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा. आम्ही त्याच्या हौतात्म्याला झुकून मानवंदना देत आहोत. असा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा'',असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शहीद जवान औरंगजेबबाबत गौरवोद्गार काढले आहेत. 

काय आहे आजचे सामना संपादकीय?कोणत्याही संकटाचा सामना करण्यास आमचे संरक्षण दल नेहमीच सज्ज असते. तीनही सेनादलांचे प्रमुख तसे सांगत असतात, पण कश्मीरातील अतिरेक्यांचे थैमान पाहता या देशाला खरेच संरक्षणमंत्री आहे काय? असा प्रश्न पडला आहे. अत्यंत कमजोर व कुचकामी, बिनचेहऱ्याची व्यक्ती संरक्षणमंत्री पदावर बसवून आपण देशाचे नुकसान करीत आहोत. हिंदुस्थानच्या सैन्यक्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण नेतृत्व कच खात आहे. तसे नसते तर ऐन रमजानच्या महिन्यात बहाद्दर जवान औरंगजेबची हत्या करण्याचे धाडस अतिरेक्यांनी केले नसते. एक औरंगजेब हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला. त्याचे थडगे महाराष्ट्राच्या मातीत बांधलेच आहे. औरंगजेब या नावाचा जेवढा तिटकारा आणि द्वेष महाराष्ट्राने केला तेवढा अन्य कुणाचा केला नसेल, पण आम्ही दुसऱ्या एका औरंगजेबाच्या प्रेमात पडलो असून त्याचे शौर्य व हौतात्म्य हे देशाला प्रेरणादायी ठरणारे आहे.  कश्मीरमधील हा औरंगजेब शहीद झाला आहे. त्याच्या हौतात्म्याचा राष्ट्रीय सन्मान होणे गरजेचे आहे. या औरंगजेबाचा गुन्हा काय, तर कश्मीरात उच्छाद मांडणाऱ्या व ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या आरोळय़ा मारणाऱ्या दहशतवाद्याचा त्याने निधड्या छातीने खात्मा केला. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरने कश्मीर खोऱ्यात बॉम्ब आणि बंदुकांनी हैदोस घातला होता.  दहशत व राष्ट्रद्रोहाचा निर्घृण चेहरा म्हणजे समीर टायगर असे भयंकर वातावरण होते. 

अशा या समीर टायगरला ‘खतम’ करण्याच्या मोहिमेत औरंगजेब आघाडीवर होता. समीर टायगरला खतम करण्यास गेलेल्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होता. तो ‘४४ राष्ट्रीय रायफल्स बटालियन’मध्ये ‘रायफल मॅन’ म्हणून शोपिया जिल्हय़ात कर्तव्य बजावत होता. टायगरचा ठावठिकाणा काढून त्याच्यापर्यंत दहशतवादविरोधी पथकास पोहोचविण्यात औरंगजेबाने महत्त्वाची भूमिका बजावली. तो प्रखर राष्ट्रभक्त होता व निधड्या छातीने देशरक्षणासाठी लढत होता. कश्मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी पथकातील ती तळपती तलवार होती. त्यामुळेच दहशतवाद्यांच्या डोळय़ांत तो खुपत होता. ईदच्या सुट्टीसाठी औरंगजेब घरी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले व नंतर त्याची हत्या केली. हत्येपूर्वी त्याचा एक व्हिडीओ दहशतवाद्यांनी व्हायरल केला. त्यातही औरंगजेब कुठेही खचलेला व शरण गेलेला दिसत नाही. अतिरेक्यांनी औरंगजेबाचे अपहरण केले, त्याच्यावर अत्याचार केले. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला, पण मृत्यू समोर दिसत असतानाही तो डगमगला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भयाची रेषा दिसली नाही. तो शरण गेला नाही व बेडरपणे देशासाठी शहीद झाला. त्याच्या हौतात्म्याने रमजानचा महिना अधिक पवित्र झाला. इस्लामच्या नावाखाली कश्मीरात जो हिंसाचार सुरू आहे तो धक्कादायक आहे. औरंगजेब धर्माने मुसलमान असूनही इस्लामी अतिरेक्यांशी लढतो या रागातून त्याची हत्या झाली. 

औरंगजेबासारखे अनेक मुसलमान जवान देशासाठी कश्मीरच्या रणभूमीवर शहीद होत आहेत व देशाने त्यांच्याविषयी सदैव अभिमान बाळगायला हवा. या औरंगजेबाच्या बेडर आणि निधड्या छातीचे माप किती, औरंगजेबाची छाती किती इंचाची या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण देशातील मुसलमानांनीच नव्हे तर हिंदूंनीही औरंगजेबाच्या हौतात्म्यास सलाम करायला हवा. हा देश आजही अखंड आहे तो औरंगजेबासारख्या असंख्य निधड्या छातीच्या जवानांमुळे. कर्नल महाडिकांपासून औरंगजेबापर्यंत आमचे जवान कश्मीर खोऱ्यात जीवाची बाजी लावत असताना सरकार कुठे आहे? शिरकुर्म्याची दातात अडकलेली शिते काढीत बसले आहे. आता म्हणे सरकारने लष्कराला जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादविरोधी अभियान सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ते सर्व ठीक असले तरी मग या शस्त्रसंधीने नेमके साधले काय, हा प्रश्न उरतोच. औरंगजेब हा तरुण लष्करी जवान होता. धाडसी होता. देशासाठी तो शहीद झाला. राजकारणाचा व्यापार करून सत्ता मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना औरंगजेबाच्या हौतात्म्याचे मोल कधीच समजणार नाही. मोगल सुलतान औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील थडग्यावर ‘नमाज’ पढून मतांचा ठेका मिळवणाऱ्यांनी कश्मीरात हौतात्म्य पत्करलेल्या औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक व्हावे. आम्ही त्याच्या हौतात्म्याला झुकून मानवंदना देत आहोत, त्याच्या कबरीवर फुले उधळीत आहोत व अश्रंtचे शिंपण करीत आहोत. असा औरंगजेब या देशातील प्रत्येक मुसलमानाच्या घरात निर्माण व्हावा. या औरंगजेबाचे हौतात्म्य अमर आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेनिर्मला सीतारामनभाजपासैनिकजम्मू-काश्मीरशिवसेनाभारतीय जवान