Join us

“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:53 IST

Uddhav Thackeray Live Mumbai: तुम्ही सैन्याचे पाय बांधले. सैन्याने धडक दिली होती. आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्प यांचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. असे पंतप्रधान, गृहमंत्री काय करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray Live Mumbai: आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय ठेवला, तुमच्यासमोर उभे राहिलो, त्यावेळेस आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीननशी करायला तुम्हाला लाज वाटली नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. आम्ही इंडियन मुजाहिद्दीनसारखे होतो. तर आज जगभरात तुम्ही न केलेल्या शौर्याचे कौतुक सांगण्यासाठी आमचे पक्षाचे खासदार तुम्ही का पाठवले. आम्ही इंडियान मुजाहिद्दीन मग तुम्ही कोण? अशी थेट विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपा, शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली. तुम्ही जगभर फिरलात, पण या कठीण काळात एकही मित्र देश तुमच्यासोबत उभा राहिला नाही. आम्ही तुमच्यासोबत राहिलो. सगळे जग तुमच्या विरोधात आहे. देशातील मित्र तुम्ही तोडून टाकत आहात, संपवून टाकत आहात. आमची तुलना देशद्रोह्यांसोबत केली, पण संकट आल्यावर आमचेच खासदार जगभरात नेलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले

पक्ष वेगळे असतील, मतभेद असतील आणि आहेतही. परंतु, संपूर्ण जगासमोर जाताना आम्ही सगळे एक आहोत, याच भावनेने गेले पाहिजे. ते पवित्र कर्तव्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मला पंतप्रधान मोदी आणि भाजपाला विचारायचे आहे की, तुमची हिंदुत्वाची व्याख्या नेमकी आहे तरी काय? तुम्ही आम्हाला सांगता की, हिंदूत्व सोडले, मग तुम्ही काय सोडले? मधेच मशिदीत जाऊन सौगात वाटता, घराघरात जाऊन शेंदूर वाटता. सैन्यातील महिला अधिकाऱ्याबाबत तुमचा मंत्री वादग्रस्त विधान करतो आणि तो अद्यापही पक्षात आहे. कारवाई होत नाही. ही अशी नालायक औलाद भाजपामध्ये आहे. या भाजपाकडून आपण देश सुधारण्याची भाषा करत आहोत. हे कसले देशात सुधारणा करणार. तुम्ही सैन्याचे पाय बांधले. सैन्याने धडक दिली होती. आतपर्यंत सैनिक गेले होते, आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्प यांचा फोन आल्यावर यांचा आवाजच गेला. असे पंतप्रधान काय करायचे? असे गृहमंत्री काय करायचेत? चार दहशतवादी आत आले कसे? पर्यटकांना गोळ्या घालणारे दहशतवादी गेले कुठे? आकाशात गेले, पाताळात गेले की, भाजपात गेले? अजून मिळत कसे नाहीत? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना केला. 

दरम्यान, संपूर्ण देशाची भाजपाने वाट लावली. आता शिवसेना संपवायचे स्वप्न पाहत आहेत. अरे, तुम्ही कितीही स्वप्न पाहा, शिवसेना तुम्हाला संपवून सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना खतम करून तुमच्या छाताडावर भगवा रोवला नाहीतर शिवसेना म्हणून नाव सांगणार नाही, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला. एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्याला आता भांडून चालणार नाही. भाजपाची नीतीच आहे. मुंबई महापालिकेसाठी आता हिंदू-हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावत आहेत. हिंदी सक्तीची करायची, हिंदी सक्तीची होऊ देणारच नाही, हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी करून पाहावी, असे खुले आणि जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाऑपरेशन सिंदूरपहलगाम दहशतवादी हल्ला