Join us  

गणपती जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, इंधन दरवाढीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 7:24 AM

Fuel Hike : इंधन दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.   

मुंबई - इंधन दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.   '' ‘महंगाई डायन’ नष्ट व्हावी म्हणून 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’ पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल. बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, हिच अपेक्षा आणि प्रार्थना!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीका केली आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - श्रीगणरायांवरील अपार श्रद्धा सर्व अडथळे आणि समस्यांवर मात करते ती अशी. अर्थात, सरकार म्हणून बसलेले जेव्हा कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतात तेव्हा स्वतःच स्वतःला सावरण्याशिवाय सामान्य जनतेसमोर पर्याय नसतो. 

- महागाईचा प्रचंड आगडोंब उसळलेला असतानाही गणेशोत्सवाची लगबग, उत्साह, धामधूम कमी झाली नाही. 

- ‘महंगाई डायन’ नष्ट व्हावी म्हणून 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांच्याच काळात ही ‘डायन’ पुन्हा जनतेच्या बोकांडी बसली आहे. त्यात रोजच्या इंधन दरवाढीचा मारही सोसावा लागत आहे. पुन्हा ज्यांनी ही दरवाढ नियंत्रणात ठेवायची, तेच तेलाच्या जागतिक बाजारपेठेकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहेत. 

- देशाची सुरक्षा, सीमेवरील अशांतता, सामाजिक अस्वस्थता, नोटाबंदी आणि जीएसटीच्या तडाख्यातून न सावरलेली अर्थव्यवस्था, रोजगार निर्मितीचे राज्यकर्त्यांचे पोकळ दावे, शेतकरी आत्महत्या आणि फसलेली कर्जमाफी, सत्ताधारी आमदारच मुली पळवून नेण्याची जाहीर भाषा करीत असल्याने राज्यातील महिला वर्गात पसरलेली भीती अशी इतरही विघ्ने आहेतच. ती दूर करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. 

- मात्र त्याऐवजी काखा वर करून जनतेला फुफाट्यात लोटले जात आहे. त्यामुळे महागाईचे विघ्न दूर कर आणि आमचे जगणे सुसह्य कर असे साकडे थेट विघ्नहर्त्या गणरायांनाच घालावे लागेल. बुद्धीची देवता असलेले गणपती राज्यकर्त्यांना जबाबदारी न झटकण्याची सुबुद्धी देतील, हिच अपेक्षा आणि प्रार्थना!

टॅग्स :उद्धव ठाकरेइंधन दरवाढनरेंद्र मोदीगणेशोत्सव