Join us  

सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 7:56 AM

Surgical Strike : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. 

मुंबई -  भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून समाचार घेतला आहे.  लष्कर प्रमुखांसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सर्जिकल स्ट्राईकवरुन सुरू असलेले राजकारण थांबवा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला हाणला आहे. ''दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला. हा सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच झाला होता, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा मिळाला काय? या स्ट्राईकने पाकचे शेपूट सरळ झाले नसेल तर दुसऱया ‘स्ट्राईक’ची धमकी कसली देता? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले! आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे --  पाकिस्तानी कुत्र्याचे शेपूट सत्तर वर्षांपासून वाकडे ते वाकडेच आहे. पाकिस्तान सुधारणार नाही. तरीही आमचे राज्यकर्ते पाकड्यांच्या बाबतीत इतके आशावादी कसे असू शकतात? -  सर्जिकल स्ट्राईकनंतर कश्मीरात पाक पुरस्कृत हिंसाचार वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत पाकड्यांचे हल्ले व आमच्या सैनिकांची बलिदाने वाढत आहेत. गेल्या महिनाभरात सुरक्षा दलाच्या जवानांचे अपहरण करून त्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. जवानांची मुंडकी उडवून हिंदुस्थानला आव्हान दिले जात असताना आम्ही फक्त सर्जिकल स्ट्राईकचे इशारे देत बसलो आहोत. - सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱया वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यात सहभागी असलेला आमचा एक बहादूर जवान दहशतवाद्यांशी लढताना शहीद होत असेल तर कसे व्हायचे? आता या सर्जिकल स्ट्राईकचा दिवस शौर्य दिवस, विजय दिवस साजरा करा असे आदेश म्हणे विद्यापीठांना देण्यात आले. जवानांच्या शौर्याचा सन्मान करण्याची ही कसली पद्धत? -  जवानांना आदेश हवाय तो पाकड्यांच्या हद्दीत घुसून त्यांना थडग्यात गाडण्याचा, पण सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केले जात आहे हा जवानांचा अपमानच आहे. -   लोकसभा निवडणुकांचा माहोल निर्माण करण्यासाठी असे पाच-पंचवीस स्ट्राईक उद्या केले जातील किंवा पाकिस्तानबरोबरच एखादे लुटूपुटूचे युद्धही खेळवले जाईल. - अयोध्येच्या लढय़ात करसेवकांच्या हौतात्म्याने शरयू लाल झाली, पण मंदिर काही झाले नाही. तसे कश्मीर प्रश्नाचे, पाकिस्तान विषयाचे राजकारण केले जात आहे. सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न संपला नाही. - त्यामुळे पुढचे कठोर पाऊल उचलणे देशहिताचे आहे व त्यासाठी 56 इंचाच्या शूर छातीचे दर्शन जनतेला घडायला हवे. - कश्मीरमध्ये अशांतता, रक्तपात घडवला जात असून तरुणांना ‘दहशतवादी’ बनवले जात आहे, असेही आमच्या लष्करप्रमुखांनी सांगितले. पाकिस्तानचे हे नापाक उद्योग एखाद्या सर्जिकल स्ट्राईकने थांबतील काय? सर्जिकल स्ट्राईक हा शत्रूला अचानक धक्का देण्यासाठी केला जातो. पण अशा धक्क्याने डोके ताळय़ावर येईल ते पाकिस्तान कसले!- आपल्या लष्करप्रमुखांचा आशावाद दुर्दम्य आहे, पण पाकिस्तानकडून आशा बाळगता येणार नाही. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण चालले आहे. ते थांबले तरी पुरे.

 

टॅग्स :सर्जिकल स्ट्राइकनरेंद्र मोदीउद्धव ठाकरेबिपीन रावत