Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का हीच चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी युती करावी अशी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युती करायची का नाही यासंदर्भात माजी नगरसेवकांना विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना युती केली तर फायदाच होईल अशी कबुली नगरसेवकांनी दिली आहे. मुंबईतल्या युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे युतीसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची मातोश्री निवासस्थानी बैठक घेतली. महापालिकेसाठी काय रणनिती आखण्यात यावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार का याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी काही माजी नगरसेवकांना आपण युती करायची का अशी विचारणा केली. माजी नगरसेवकांची मते जाणून घेऊन निर्णय घेण्याचे उद्धव ठाकरेंनी योजना आखली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या प्रश्नावर माजी नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मनसेसोबत युती केली तर फायदाच होईल आणि त्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यावर बोलताना मुंबई पालिकेसाठी आपल्याला पालिकेसाठी ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. लवकरत शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडण्यात येणार आहे," असा संदेश उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला. तर येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते असाही अंदाज उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला.