लग्नास नकार देणाऱ्याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निकाल; न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:19 IST2026-03-19T11:19:26+5:302026-03-19T11:19:54+5:30
१३ मे २०२१ रोजी दिवा खाडीत लाल रंगाच्या लोखंडी ट्रंकमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता...

लग्नास नकार देणाऱ्याच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निकाल; न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांचे कौतुक
डॉ. खुशालचंद बाहेती -
मुंबई : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पण नंतर लग्नास नकार देणाऱ्याचा खून करून मृतदेह खाडीत फेकणाऱ्या बहीण-भावाला ठाणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १३ मे २०२१ रोजी दिवा खाडीत लाल रंगाच्या लोखंडी ट्रंकमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता.
मृतदेह दोऱ्यांनी बांधून गोणपाटात घालून ट्रंकमध्ये लॉक केला होता. या गुन्ह्याचा तपास ट्रंकच्या शोधापासून सुरू झाला. पोलिसांनी अथक प्रयत्न करून ट्रंक बनवणाऱ्या विक्रेत्यापर्यंत पोहोच घेतली. आरोपी अनिता यादवपर्यंत पोलिस पोहोचले. तपासात मृत व्यक्ती मनीष कुमार यादव असून तो अनितासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता, हे निष्पन्न झाले. लग्नास नकार दिल्यामुळे अनिता यादव आणि तिचा भाऊ विजय भालारे यांनी मनीषचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपी ट्रंक नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे डाग असलेला हातोडा हस्तगत केले.
‘गुन्ह्याच्या तपासातील रणनीती प्रशंसनीय’
न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष टागड, रामचंद्र मोहिते, गुन्हे शाखेचे एपीआय भूषण कापडणीस यांच्या कामगिरीचे कौतुक केले. अल्प धागेदोऱ्यावरून आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष कौशल्य आणि तांत्रिक प्रावीण्य आवश्यक असते. तांत्रिक विश्लेषण आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याची पद्धत, तपासातील रणनीती प्रशंसनीय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.