Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा'; शरद पवारांच्या ४ महत्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:18 IST

महाविकास आघाडीच्या या बैठकीत शरद पवारांनी काही महत्वाच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस सुनील केदार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचेही महत्वाचे नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. मात्र मात्र शिवसेनेचे कोणतेही नेते यावेळी उपस्थित नव्हते. 

महाविकास आघाडीच्या या बैठकीत शरद पवारांनी काही महत्वाच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे. तसेच संध्याकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येईल, असं बैठकीत ठरविण्यात आले. जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायचं. शेवटपर्यंत महाविकास आघाडी टिकावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची, चर्चा बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात, असं बंडखोर आमदार एकनाथ शिंदे दर्शनानंतर म्हणाले. 

आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच आम्ही उद्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर देखील जाणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. राज्यात कमालीची अस्थिरता आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा जावा केला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी विरोधी पक्षाने केली. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल यांनी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शिंदे गटाची स्ट्रॅटेजी-

राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असा स्टँड बंडखोर गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळशरद पवारशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार