तृतीयपंथींनी केले पादचाऱ्याला १५ हजार रुपयांसाठी ब्लॅकमेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:45 IST2025-05-27T12:45:30+5:302025-05-27T12:45:30+5:30
पोलिसांनी कांदळवनात जाऊन तिन्ही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आणि खार पोलिस ठाण्यात आणले.

तृतीयपंथींनी केले पादचाऱ्याला १५ हजार रुपयांसाठी ब्लॅकमेल
मुंबई : आम्हाला १५ हजार दे, नाहीतर तुला छेडछाडीच्या खोट्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी देणाऱ्या तीन तृतीयपंथींवर खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संध्या प्रधान, नागेंद्र सरदार आणि कविता कदम अशी या तिघांची नावे आहेत.
सांताक्रुज पश्चिमेकडे राहणारे आणि डिलिव्हरी बॉयचे काम करणारे नूरआलम शेख (२९) हे २४ मे रोजी रात्री वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोडजवळून जात होते. तेव्हा सार्वजनिक शौचालय न आढळल्याने ते तिथेच असलेल्या कांदळवनात पायवाटेने गेले. त्याच वेळी त्या ठिकाणी तीन तृतीयपंथी आले आणि त्यांनी हाताने टाळ्या वाजवत शेखकडे पैशाची मागणी केली. शेखने त्यांना ५०० रुपये स्वखुशीने पुढे केले. मात्र, त्यांनी ते न स्वीकारल्याने शेखने त्यांना हजार रुपये देऊ केले. त्यावर या तिघांनी शेखकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेणार नाही, असे त्यांनी शेखला धमकावले. शेखने पैसे द्यायला नकार दिल्यावर तिघांनीही गोंधळ घालत आम्ही आमचे कपडे फाडून घेऊ आणि आमची छेडछाड केली, अशी खोटी तक्रार तुझ्या विरोधात देऊ, अशी धमकी दिली. तेव्हा शेख घाबरून कांदळवनातून बाहेर पडले आणि त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी कांदळवनात जाऊन तिन्ही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आणि खार पोलिस ठाण्यात आणले.