मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. भाजपा-शिंदेसेना युतीला काठावरचे बहुमत मिळाले आणि त्यानंतर मुंबईच्या राजकारण वेगवेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत. ठाकरेंच्या संपर्कात नगरसेवक असल्याचीही चर्चा आहे. यावर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सविस्तर खुलासा केला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेचा निकाल लागला. युतीला बहुमत मिळाले आणि महत्त्वाचा प्रश्न चर्चेला आला की महापौर कोणाचा होणार? भाजपाचामहापौर झाला, तर शिंदेसेनेच्या वाट्याला कोणती पदे मिळणार? या प्रश्नांभोवती चर्चेने फेर धरलेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील सर्व २९ नगरसेवक हॉटेलमध्ये हलवले.
शिंदेसेनेच्या नेत्या म्हात्रे काय म्हणाल्या?
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दबावाचे राजकारण होताना बघायला मिळत आहे. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये का ठेवले, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत असताना त्यावर पहिल्यांदाच पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी भूमिका मांडली आहे.
"आम्ही युती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. आमचे जवळपास २० नगरसेवक हे नवीन आहेत. त्यांना महापालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती नाही. त्यामुळे आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसांचे शिबीर घेतले आहे. म्हणूनच हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत", असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
"उद्धवसेनेच्या उमेदवारांनाच हरवून आमचे नगरसेवक आले आहेत. युती ही बाळासाहेबांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठीचा हा विषय नाहीये. महापौर पदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील", असे शीतल म्हात्रे यांनी महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या वाटाघाटीवर बोलताना सांगितले.
संजय राऊतांवर निशाणा
शीतल म्हात्रे यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या, "संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असे आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातले. खासदारकी संपत आली आहे. ती सुद्धा शिंदेंच्याच कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील की मला शिंदेंकडे घेऊन चला", असा शीतल म्हात्रेंनी राऊतांना लगावला.